सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाचा खंड; सरसकट आर्थिक मदत, मागील व चालू वर्षाचा पीकविमा तातडीने वितरित करण्याची मागणी

✍️उत्तम लोखंडे
परभणी/सेलू प्रतिनिधी

सेलू तालुक्यात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस समाधानकारक होईल, अशी अपेक्षा असल्याने सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच मोठ्या कष्टाने आर्थिक जुळवाजुळव करून पेरणी केली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, ऊस, कांदा, राजमा तसेच विविध फळबागांची लागवड करण्यात आली. मात्र, पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सध्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पावसाअभावी अनेक भागांतील पिकांनी माना टाकल्या आहेत. पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

या परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मागील वर्षाचा प्रलंबित पीकविमा आणि चालू वर्षाचा पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

पावसाचा दीर्घकाळ खंड, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा वाढता बोजा आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने सेलू तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजयराव भांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र काका लहाने, आप्पासाहेब डख, प्रकाशराव मुळे, पुरुषोत्तम अण्णा पावडे, नगरसेवक मिलिंद पवार, शरद आकात, चंद्रकांत गाडेकर, जीवन आवटे, शुभम कदम, प्रदीप रोडगे, सुधाकर रोकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाद्वारे मांडलेल्या मागण्यांवर शासन व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl