रघुवीर घाटातील महाकाय दरड अखेर हटवली; चार वाजता वाहतूक पूर्ववत! भूषण मोरे यांच्या पुढाकाराला यश; अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी ठाण मांडून युद्धपातळीवर करून घेतले दरड हटविण्याचे काम
रघुवीर घाटातील महाकाय दरड अखेर हटवली; चार वाजता वाहतूक पूर्ववत!
भूषण मोरे यांच्या पुढाकाराला यश; अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी ठाण मांडून युद्धपातळीवर करून घेतले दरड हटविण्याचे काम
तापोळा प्रतिनिधी :
रघुवीर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने ठप्प झालेली वाहतूक अखेर शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत करण्यात आली. श्री. भूषण मोरे यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या बंधू अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
रघुवीर घाटात मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि दरडीचा भाग रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वाहनांना मार्गातच थांबावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.
घटनेची माहिती मिळताच भूषण मोरे यांनी तातडीने यंत्रणा गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला. आवश्यक साधनसामग्री व कामगार उपलब्ध करून देत दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे बंधू अनिकेत मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून काम करून घेतले. रस्त्यावर साचलेली माती, मोठमोठे दगड आणि दरडीचा मलबा हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
सततच्या प्रयत्नांनंतर शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील माती व दगड बाजूला करण्यात आले. त्यामुळे रघुवीर घाटातील मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला असून वाहनांची ये-जा पुन्हा सुरू झाली आहे.
दरड कोसळल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तातडीने केलेल्या या उपाययोजनेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी भूषण मोरे तसेच अनिकेत मोरे यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, घाट परिसरात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहनही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment