डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची धडक मोहीम; ४ लाख ७४ हजार घरांचे सर्वेक्षण किटकजन्य आजारांचा धोका वाढला; नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे आरोग्य विभागाचे आवाहन
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची धडक मोहीम; ४ लाख ७४ हजार घरांचे सर्वेक्षण
किटकजन्य आजारांचा धोका वाढला; नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे आरोग्य विभागाचे आवाहन
पुणे प्रतिनिधी :
पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण होत असल्याने डेंग्यू, मलेरिया यांसह विविध किटकजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCVBDC) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे डासांची संख्या वाढून किटकजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात तब्बल ४ लाख ७४ हजार ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यावर भर
सर्वेक्षणादरम्यान घर व परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. दूषित अथवा अनावश्यक पाणीसाठे रिकामे करणे, आवश्यक ठिकाणी अळीनाशक औषधांची मात्रा देणे तसेच रिकामे करता न येणाऱ्या पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींच्या सहकार्याने पाणी साचणारे खड्डे बुजविणे, बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात धुराळणी करणे तसेच नागरिकांना नियमितपणे ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आठवड्यातून एक दिवस घर व परिसरातील सर्व पाणीसाठे पूर्णपणे रिकामे करून स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संशयित तापाच्या रुग्णांची तपासणी
किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखण्यासाठी संशयित तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत आहे. बाधित आढळलेल्या रुग्णांना आवश्यक ते समूळ उपचार देण्याची कार्यवाही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा अन्य संशयित लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आठवडे बाजार, शाळा आणि ग्रामसभांमधून जनजागृती
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही आरोग्य विभागाने विशेष भर दिला आहे. आठवडे बाजार, गटसभा आणि शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना डासांची उत्पत्तीस्थळे, किटकजन्य आजारांपासून बचावाचे उपाय आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत माहिती दिली जात आहे.
याशिवाय जनजागृतीपर बॅनर्स, घोषवाक्ये आणि विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांना आपल्या घरात व परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
घरातील पाणीसाठ्यांची नियमित स्वच्छता आवश्यक
घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद आदी पाणीसाठे आठवड्यातून किमान एकदा पूर्णपणे रिकामे करून स्वच्छ करावेत. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांनाही योग्य पद्धतीने झाकण बसवावे. घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
भंगार साहित्य, फुटके डबे, निरुपयोगी वस्तू, जुने टायर आणि अन्य वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
कूलर, मनी प्लांट किंवा चायनीज प्लांटमध्ये साचलेले पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे. फ्रिजच्या ट्रेमध्ये साचणारे पाणीही वेळोवेळी काढून टाकावे. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे-खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि शक्य असल्यास पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.
‘डासांची उत्पत्ती रोखणे ही सामूहिक जबाबदारी’
“डासांची उत्पत्ती रोखणे ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरात व परिसरात पाणी साचू न देऊन आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.
पावसाळ्यात किटकजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी त्याला नागरिकांचे सहकार्य मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकते. त्यामुळे ‘डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करा, किटकजन्य आजारांना दूर ठेवा’ असा संदेश आरोग्य विभागाने नागरिकांना दिला आहे.
#किटकजन्यआजार #डेंग्यू #मलेरिया #डासप्रतिबंध #आरोग्यविभाग #पुणेजिल्हा #आरोग्यजागृती #पावसाळीआजार #नागरिकसहभाग
Comments
Post a Comment