सेलू शहरात अतिक्रमण हटविण्याची धावपळ; महामार्ग रुंदीकरणाला वेगतीन दिवसांची अंतिम मुदत मिळताच नागरिकांचा स्वयंस्फूर्त पुढाकार; लक्कडकोट ते रायगड कॉर्नरदरम्यान अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात
सेलू शहरात अतिक्रमण हटविण्याची धावपळ; महामार्ग रुंदीकरणाला वेग
तीन दिवसांची अंतिम मुदत मिळताच नागरिकांचा स्वयंस्फूर्त पुढाकार; लक्कडकोट ते रायगड कॉर्नरदरम्यान अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात
✍️उत्तम लोखंडे,
परभणी/सेलू :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी (देवगाव फाटा–सेलू–पाथरी) रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या कडक नोटिसचा परिणाम आता सेलू शहरात स्पष्टपणे दिसून येत आहे. महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, जालना यांच्या वतीने तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. या नोटिसनंतर लक्कडकोट ते रायगड कॉर्नरदरम्यानच्या व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा न करता स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे.
महामार्गालगत उभारण्यात आलेले शेड, जाहिरात फलक, तात्पुरती बांधकामे, दुकानांसमोरील वाढीव भाग तसेच इतर अडथळे नागरिकांकडून स्वतःहून काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कामही सुरू आहे. प्रशासनाकडून थेट कारवाई झाल्यास साहित्याचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
३० मीटरच्या हद्दीतील अतिक्रमणांना नोटिस
राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना १५-१५ मीटर, म्हणजेच एकूण ३० मीटरच्या हद्दीत असलेली अनधिकृत अतिक्रमणे तीन दिवसांच्या मुदतीत हटविण्याचे निर्देश नोटिसद्वारे देण्यात आले होते. निर्धारित मुदतीत अतिक्रमणे स्वतःहून न हटविल्यास प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून ती हटविण्यात येतील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.
या नोटिसमुळे महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी आपापल्या दुकानांसमोरील वाढीव बांधकामे व साहित्य हटविण्यास सुरुवात केली असून, महामार्गाची हद्द मोकळी करण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य केले जात आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा
सेलू शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीची वर्दळ वाढत आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि दुकानांसमोरील वाढीव बांधकामांमुळे रस्ता अरुंद होऊन अनेकदा वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. विशेषतः बाजारपेठेच्या परिसरात वाहनांची संख्या वाढल्यास वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची क्षमता वाढण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाच्या कारवाईपूर्वी नागरिकांचा पुढाकार
प्रशासनाने दिलेल्या अंतिम मुदतीमुळे अतिक्रमणधारकांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली होती. मात्र, थेट कारवाई होण्यापूर्वीच अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याने प्रशासनावरील कारवाईचा ताणही कमी होणार आहे. त्याचबरोबर महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्यास मदत होऊन प्रकल्पाच्या कामालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महामार्ग रुंदीकरणाचे काम नियोजनबद्ध आणि वेगाने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा सेलूकरांकडून व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविण्याची सध्याची मोहीम ही शहरातील वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Comments
Post a Comment