१०५ गाव समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयाच्या दारी; एकजुटीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन
१०५ गाव समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयाच्या दारी; एकजुटीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन
रस्ते, पर्यायी मार्ग, टोलवसुली, आरोग्य, मोबाईल नेटवर्कसह विविध मूलभूत प्रश्न सोडविण्याची मागणी; प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
मुंबई प्रतिनिधी :
महाबळेश्वर व जावली तालुक्यातील कोयना, सोळशी, कोंदाटी, बामणोली आणि परिसरातील १०५ गाव समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी समाजबांधवांनी एकजुटीने मुंबई गाठली. सन्माननीय श्री. अशोकदादा सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी १०५ गाव समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
१०५ गाव समाजातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, आरोग्य, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, टोलवसुली, पर्यायी रस्ता, गावठाण आणि इको सेन्सिटिव्ह झोनसह अनेक मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हे प्रश्न वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे मांडण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने ते शासनाच्या पातळीवर मांडण्यासाठी समाजाचे शिष्टमंडळ मुंबईत पोहोचले.
१०५ गावांना जोडणाऱ्या महाबळेश्वर आराम चौक ते कारवी आळा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खचणे आणि खड्डे पडण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
महाबळेश्वर ते तापोळा रस्ता बंद झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी मोळेश्वर-वारणे वस्ती ते कुरोशी मार्गे तापोळा या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली. सध्या हा मार्ग नादुरुस्त असून तो आपत्कालीन पर्यायी रस्ता म्हणून विकसित करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
१०५ गावांतील भूमीपुत्रांना आपल्या गावाकडे ये-जा करताना पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात टोल द्यावा लागत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला. स्थानिक भूमीपुत्रांना टोलवसुलीपासून दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
परिसरातील आरोग्य सुविधांचाही प्रश्न गंभीर असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांना उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असल्याने परिसरात सक्षम शासकीय आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा पुरेशी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, ऑनलाइन शासकीय सेवा, व्यवसाय, रोजगार आणि आपत्कालीन संपर्कावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये चांगली मोबाईल आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कंपन्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
इको सेन्सिटिव्ह झोनमधील नियमांमुळे स्थानिक नागरिकांना घरबांधणी, शेती, व्यवसाय आणि विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण कायम ठेवून स्थानिक नागरिकांचे हक्क आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रत्येक गावामध्ये ‘घर तिथे गावठाण’ या संकल्पनेनुसार नियोजन करावे, तसेच १०५ गाव समाज समितीच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली.
समाजाच्या विविध प्रश्नांचे निवेदन घेऊन शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या दिवशी मंत्रालयात येणार नसून सह्याद्री अतिथीगृह येथे भेटणार असल्याचे समजल्यानंतर शिष्टमंडळाने तेथे जाऊन त्यांची भेट घेतली. वेळेची व्यस्तता असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०५ गाव समाजाच्या प्रश्नांना महत्त्व देत श्री. अशोकदादा सकपाळ आणि श्री. निशांत बुवा सकपाळ यांच्याकडून निवेदन स्वीकारले. संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
या भेटीसाठी समाजातील अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते. यामध्ये श्री. अशोकदादा सकपाळ, श्री. लक्ष्मणदादा नारायण जाधव, श्री. निशांत बुवा सकपाळ, श्री. के. के. शेलार साहेब, श्री. संजय दगडू जाधव, श्री. सतीश शिंदे, श्री. विश्वनाथ दिनकर घाडगे, श्री. तानाजी लक्ष्मण सपकाळ, श्री. सुरेंद्र चिमाजी जाधव, श्री. संतोष नारायण सपकाळ, श्री. सोमराज अनंत शिंदे, श्री. संजय श्रीरंग उतेकर, श्री. पांडुरंग बाबू गमरे आणि श्री. शैलेश विठ्ठल शिंदे यांच्यासह समाजबांधवांचा सहभाग होता.
या भेटीतून १०५ गाव समाजाची एकजूट आणि आपल्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची तयारी स्पष्ट झाली. “एकटा माणूस प्रश्न मांडू शकतो; मात्र समाज एकजुटीने उभा राहिला तर प्रश्न सोडवण्याची ताकद निर्माण होते,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
१०५ गाव समाजाच्या विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment