पाणंद शेतरस्ता बंद; दोन वर्षांपासून शेत पडीक!सिद्धनाथ बोरगावच्या शेतकऱ्याची तहसीलदारांकडे धाव; तात्काळ रस्ता खुला करून देण्याची मागणी
पाणंद शेतरस्ता बंद; दोन वर्षांपासून शेत पडीक!
सिद्धनाथ बोरगावच्या शेतकऱ्याची तहसीलदारांकडे धाव; तात्काळ रस्ता खुला करून देण्याची मागणी
✍️उत्तम लोखंडे ,
परभणी/सेलू प्रतिनिधी
शेतात जाण्या-येण्यासाठी असलेला अधिकृत पाणंद शेतरस्ता बंद करण्यात आल्याने सिद्धनाथ बोरगाव (ता. सेलू) येथील शेतकरी विठ्ठल कचरू नाटकर हे गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. शेताकडे जाणारा एकमेव मार्ग बंद झाल्याने त्यांची शेती पडीक राहिली असून, शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. याप्रकरणी नाटकर यांनी सेलू तहसीलदारांकडे लेखी तक्रार करून पाणंद शेतरस्ता तातडीने खुला करून देण्याची मागणी केली आहे.
सिद्धनाथ बोरगाव येथील रहिवासी विठ्ठल नाटकर यांच्या मालकीची मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट क्रमांक १५२ मध्ये शेतजमीन आहे. या शेतात जाण्या-येण्यासाठी नकाशावर अधिकृत पाऊलवाट/शेतरस्ता अस्तित्वात असल्याचे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. या मार्गाचा वापर नाटकर यांच्यासह परिसरातील इतर शेतकरीही शेतीच्या कामांसाठी करत होते.
मात्र, शेजारील गटातील काही शेतकऱ्यांनी हा मार्ग बंद केल्याचा आरोप नाटकर यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने शेतीची मशागत, पेरणी, पिकांची निगा तसेच शेतीमालाची वाहतूक करणे अडचणीचे झाले आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून गट क्रमांक १५२ मधील शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
शेतरस्ता बंद झाल्यामुळे केवळ शेतीची कामे ठप्प झाली नसून, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत आहे. शेती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने रस्ता बंद राहिल्यास भविष्यातही मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, नकाशावर अस्तित्वात असलेला पाऊलवाट/पाणंद शेतरस्ता प्रत्यक्षात खुला करून शेतकऱ्याला शेतीची वहिवाट करता यावी, यासाठी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नाटकर यांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गट क्रमांक १५२ मध्ये जाणारा अधिकृत पाणंद शेतरस्ता खुला करून द्यावा आणि गेल्या दोन वर्षांपासून अडलेली शेतीची वहिवाट पूर्ववत करावी, अशी अपेक्षा शेतकरी विठ्ठल नाटकर यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment