पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दाव्यांवर प्रश्नचिन्ह; वारंवार वीज खंडित झाल्याने महाबळेश्वरच्या पश्चिम भागातील नागरिक संतप्त
पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दाव्यांवर प्रश्नचिन्ह; वारंवार वीज खंडित झाल्याने महाबळेश्वरच्या पश्चिम भागातील नागरिक संतप्त
प्रतापगड प्रतिनिधी :
पावसाळ्यापूर्वी वीज वितरण यंत्रणेची सर्व आवश्यक देखभाल, दुरुस्ती तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणीची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरण (एमएसईबी) कडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पावसाळ्याची सुरुवात होताच तालुक्याच्या पश्चिम भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना तासन्तास अंधारात राहण्याची वेळ येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले तसेच व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा तसेच पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असताना पाऊस सुरू होताच वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जर आवश्यक देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी, वायरिंग तसेच इतर तांत्रिक कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण झाली असतील, तर नागरिकांना वारंवार अंधाराचा सामना का करावा लागत आहे, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमकी कारणे संबंधित विभागाने जनतेसमोर स्पष्ट करावीत तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत पश्चिम भागातील नागरिकांना अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment