पत्रकारितेच्या प्रभावाला यश! घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात; ग्रामस्थांकडून पत्रकार, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार
पत्रकारितेच्या प्रभावाला यश! घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात; ग्रामस्थांकडून पत्रकार, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजमा २६ ते घोणसपूर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि पहिल्याच पावसात रस्त्यावर निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची तातडीने दखल घेत संबंधित कंत्राटदारांकडून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून यामुळे घोणसपूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोणसपूरकडे जाणारा हा मार्ग ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच पर्यटक यांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न ठळकपणे मांडल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनी लोकहिताचा प्रश्न प्रभावीपणे शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविल्यामुळेच या कामाला गती मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर कंत्राटदाराने आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या सकारात्मक कार्यवाहीबद्दल घोणसपूर ग्रामस्थांनी वस्तुनिष्ठ आणि जनहिताची पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार मानले. तसेच विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित प्रतिसाद देणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली की, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची दर्जेदार आणि टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी. भविष्यात अशा विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य देऊन नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या घोणसपूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांनी यापुढेही समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे हे आणखी एक ठळक उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment