पर्यटनाच्या मुख्य मार्गाची दुरवस्था! लिंगमळा–नाकिंदा रस्त्यावर गटारांचा अभाव; अनेक वर्षांपासून दुरुस्ती नाही, पर्यटक व नागरिक त्रस्त
पर्यटनाच्या मुख्य मार्गाची दुरवस्था! लिंगमळा–नाकिंदा रस्त्यावर गटारांचा अभाव; अनेक वर्षांपासून दुरुस्ती नाही, पर्यटक व नागरिक त्रस्त
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लिंगमळा–नाकिंदा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, अनेक वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही ठोस दुरुस्ती न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यालगत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक गटारांची व्यवस्था नसल्यामुळे मुसळधार पावसात पावसाचे तसेच गटाराचे संपूर्ण पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून वाहनचालक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा मार्ग महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आर्थर सीट, मिडल पॉईंट आणि केट्स पॉईंट यांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो पर्यटक या मार्गाने प्रवास करतात. पर्यटन हंगामात या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारांचा पूर्णपणे अभाव असल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वेगाने वाहते. परिणामी रस्त्याची झीज वाढत असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना वाहन घसरण्याचा धोका निर्माण झाला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. पावसाचे आणि सांडपाण्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गाची अशी अवस्था महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का देणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे.
विशेष म्हणजे, गेले अनेक वर्षे या रस्त्याची कोणतीही व्यापक दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रत्येक पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असताना संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग सुरक्षित व सुस्थितीत ठेवणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना सुसज्ज गटारांची उभारणी करावी, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि भविष्यात अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment