महाबळेश्वर–तापोळा मार्ग युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपालिकेची तातडीची कारवाई, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न खचलेल्या मोरीमुळे बंद झालेल्या रस्त्यावर युद्धपातळीवर काम सुरू; जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ घटनास्थळी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
महाबळेश्वर–तापोळा मार्ग युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपालिकेची तातडीची कारवाई, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न
खचलेल्या मोरीमुळे बंद झालेल्या रस्त्यावर युद्धपातळीवर काम सुरू; जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ घटनास्थळी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर–तापोळा या महत्त्वाच्या पर्यटन मार्गावरील एमपीजी क्लबजवळील दोन नंबर मोरी खचल्याने शुक्रवारी रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून महाबळेश्वर नगरपालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत खडी, मुरूम आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू असून, दुपारपर्यंत वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुसळधार पावसामुळे मोरीचा मोठा भाग खचल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना काहीसा त्रास सहन करावा लागला असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांची गैरसोय कमी व्हावी आणि रस्ता शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत आवश्यक सूचना दिल्या. कामाचा वेग वाढवून लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी पंचायत समिती सदस्य संजय शेलार यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. नागरिकांनी सोशल मीडियावर आणि विविध व्हॉट्सअॅप गटांमधून या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
महाबळेश्वर–तापोळा मार्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक नागरिक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर सुरक्षित करून वाहतुकीसाठी खुला करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी तात्पुरत्या दुरुस्तीबरोबरच या रस्त्याची कायमस्वरूपी पुनर्बांधणी, मोरीचे सुदृढीकरण आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक कामे करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा दरवर्षी अशाच प्रकारच्या घटना घडत राहतील आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम राहील, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दुपारपर्यंत हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment