महाबळेश्वरच्या विकासाला गती; अतिवृष्टीग्रस्त भागांचा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून आढावा, तातडीच्या दुरुस्तीचे आदेश
महाबळेश्वरच्या विकासाला गती; अतिवृष्टीग्रस्त भागांचा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून आढावा, तातडीच्या दुरुस्तीचे आदेश
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसेच विविध विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
या बैठकीला नगराध्यक्ष सुनिल शिंदे, सर्व नगरसेवक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील तसेच तालुक्यातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्बांधणीची कामे आणि विकास प्रकल्पांचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत ५ व ६ जुलैच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, संरक्षक भिंती, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा तसेच दरडग्रस्त भागांमध्ये झालेल्या नुकसानीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्या सर्व कामांना प्राधान्य देऊन विलंब न करता कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, वाहतूक आणि दैनंदिन जीवन सुरळीत राहावे, यासाठी नुकसानग्रस्त ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन, आपत्ती निवारणाची सक्षम यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
महाबळेश्वरसारख्या संवेदनशील पर्यटनस्थळी विकासकामांची गुणवत्ता अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, सर्व विकासकामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी दिले. शासन महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत विविध विभागांमधील समन्वय वाढवून विकासकामांना गती देणे, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीमुळे अतिवृष्टीग्रस्त भागांतील पुनर्बांधणी व महाबळेश्वरच्या विकासकामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment