रानगव्यांचा धुमाकूळ; देवाची शेंबडीतील गरीब शेतकऱ्याच्या भातशेतीचे मोठे नुकसानपंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी; वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची मागणी
रानगव्यांचा धुमाकूळ; देवाची शेंबडीतील गरीब शेतकऱ्याच्या भातशेतीचे मोठे नुकसान
पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी; वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांची मागणी
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी गावातील गरीब शेतकरी श्री. भरत किसन साळुंखे यांच्या भातशेतीचे रानगव्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावल्याने आधीच शेती संकटात असताना, मोठ्या कष्टाने पेरणी करून उगवलेले भात पीक रानगव्यांनी अक्षरशः फस्त केल्याने संबंधित शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठी कसरत करावी लागली. पाण्याअभावी अनेकांनी पेरणी उशिरा केली, तर काहींनी मोठ्या खर्चाने शेतीची मशागत करून भाताची लागवड केली. अशा परिस्थितीत भरत साळुंखे यांनीही कर्ज काढून व मोठ्या मेहनतीने भात पिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी शेतात घुसलेल्या रानगव्यांच्या कळपाने उगवलेले भात पीक तुडवून व खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
या घटनेमुळे शेतकऱ्याच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले असून, पुढील हंगामाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीच्या घटना जावळी तालुक्यात सातत्याने घडत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची तातडीने दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी करावी, नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय, रानगवे व इतर वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे मत आहे. सौर कुंपण, संरक्षक कुंपण, वन्य प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तसेच संवेदनशील भागात नियमित गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या शेतीचे वारंवार होणारे नुकसान थांबविण्यासाठी शासन व वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
Comments
Post a Comment