रानगव्यांचा धुमाकूळ! खांबील–पोकळे येथे गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे अतोनात नुकसान; वन विभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी
रानगव्यांचा धुमाकूळ! खांबील–पोकळे येथे गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे अतोनात नुकसान; वन विभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी
तापोळा प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील खांबील–पोकळे गावात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचा वावर वाढला असून, एका गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांबील–पोकळे येथील नंदा बाळू कदम या एकट्याच शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दोन दिवसांत रानगव्यांच्या कळपाने त्यांच्या भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात पिकाची नासधूस केली. कष्टाने उभे केलेले भातपीक अक्षरशः तुडवून टाकल्याने त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात रानगव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार शेतात घुसून ते भात, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागत असून, वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे जीव धोक्यात घालून शेती करावी लागत आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची, नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला योग्य ती नुकसानभरपाई देण्याची तसेच रानगव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात मानवी वस्तीजवळ वन्य प्राण्यांचा वाढता वावर ही गंभीर समस्या बनत चालली आहे. विशेषतः पावसाळ्यात जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात शेतीकडे वळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने केवळ नुकसानभरपाईपुरते मर्यादित न राहता, अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment