महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील मोरी खचली; रस्ता रात्री बंद
महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील मोरी खचली; रस्ता रात्री बंद
नगरपालिका हद्दीतील रस्त्याची दुरवस्था पुन्हा ऐरणीवर; भूमिपूजनानंतरही काम सुरू नसल्याने नागरिक संतप्त
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर–तापोळा या अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन मार्गावर एमपीजी क्लब पासून पुढे दोन नंबर मोरी खचल्याने तसेच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शुक्रवारी सायंकाळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सतर्क केले. रात्रीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून अखेर हा मार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी अनेक वर्षांपासून मोरीची समस्या कायम असून प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यंदाही मुसळधार पावसामुळे मोरी खचल्याने रस्त्याचा मोठा भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे हलकी वाहनेही धोक्यातून मार्गक्रमण करत असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. अनेकांनी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य संजय शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. प्रशासनाकडून शनिवारी सकाळी खडी व मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला हलकी वाहने जाऊ शकतील, तर जड वाहनांना अडचण येऊ शकते, असे सांगण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी पूर्ण रस्ता बंद ठेवण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान, सोशल मीडियावर आणि स्थानिक व्हॉट्सअॅप गटांमध्ये नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "आज रात्री एखादा अनोळखी वाहनचालक या मार्गावर आला आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?", असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. अनेकांनी हा रस्ता तातडीने बंद करून जीवितहानी टाळण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे, हा रस्ता महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत येतो. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात खड्डे, मोऱ्या खचणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याची पुनरावृत्ती होत असल्याने नगरपालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, एप्रिल महिन्यात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भूमिपूजन केवळ औपचारिकता ठरले का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर दररोज शेकडो पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत धोकादायक अवस्थेतील रस्ता आणि खचलेली मोरी ही गंभीर बाब असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, तात्पुरती मुरूम टाकण्याची कामे करून प्रश्न सुटणार नाही. रस्त्याची मजबूत पुनर्बांधणी, मोऱ्यांचे सुदृढीकरण आणि पावसाळ्यापूर्वी नियमित देखभाल यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी याच समस्या पुन्हा उभ्या राहतील आणि नागरिकांचा जीव धोक्यात राहील.
Comments
Post a Comment