महाबळेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी; ₹५.४७ लाखांचा ऐवज नागरिकांना परतहरविलेले १४ मोबाईल आणि ऑनलाइन फसवणुकीतील ₹२.२५ लाख परत; तांत्रिक तपासातून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ
महाबळेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी; ₹५.४७ लाखांचा ऐवज नागरिकांना परत
हरविलेले १४ मोबाईल आणि ऑनलाइन फसवणुकीतील ₹२.२५ लाख परत; तांत्रिक तपासातून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ
महाबळेश्वर, दि. २७ (प्रतिनिधी):
महाबळेश्वर पोलीस ठाण्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांच्या हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याबरोबरच ऑनलाइन फसवणुकीतील रक्कमही परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीच्या बळावर पोलिसांनी एकूण ₹५ लाख ४७ हजारांचा ऐवज व रक्कम मूळ मालकांच्या ताब्यात देऊन सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरले आहेत.
महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची जबाबदारी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी प्रभावीपणे सांभाळली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेने CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल तसेच इतर तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या मोबाईलधारकांशी सातत्याने संपर्क साधला. चिकाटी, संयम आणि नियोजनबद्ध तपासाच्या जोरावर ₹३ लाख २२ हजार किमतीचे १४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले. त्यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून हे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
याचवेळी NCRB पोर्टलवर नोंद झालेल्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या पाच तक्रारींचाही सखोल पाठपुरावा करण्यात आला. बँका आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ₹२ लाख २५ हजारांची रक्कम संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली. सायबर गुन्ह्यांमधील ही कारवाई नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.
पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून त्यांचे हरविलेले मोबाईल किंवा ऑनलाइन फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी महाबळेश्वर पोलीस ठाणे सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. मोबाईल हरवल्यास किंवा कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास वेळ न दवडता तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा संबंधित पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे आणि पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भिलारे, शंकर गलांडे आणि बाळू भागरे यांनी केली.
आजच्या डिजिटल युगात हरविलेला मोबाईल किंवा ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत मिळणे अशक्य असल्याची भावना अनेकांच्या मनात असते. मात्र, महाबळेश्वर पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सातत्यपूर्ण तपास आणि संवेदनशील पोलिसी कार्यपद्धतीच्या बळावर नागरिकांना न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
महाबळेश्वर पोलिसांच्या या जनहितवादी उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना दिलासा देणारी भूमिका बजावणाऱ्या महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment