आंबेनळी घाट बंद म्हणजे कोयना खोऱ्याची जीवनवाहिनी ठप्प;मांघर–दुधगाव पर्यायी रस्त्याची मागणी पुन्हा तीव्रघाट बंद झाल्यास ५४ गावांचा संपर्क धोक्यात; १५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
आंबेनळी घाट बंद म्हणजे कोयना खोऱ्याची जीवनवाहिनी ठप्प;
मांघर–दुधगाव पर्यायी रस्त्याची मागणी पुन्हा तीव्र
घाट बंद झाल्यास ५४ गावांचा संपर्क धोक्यात; १५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाट हा कोयना खोऱ्यातील आणि प्रतापगड परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी मानला जातो. मात्र मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आणि रस्ता खचण्याच्या घटनांमुळे हा घाट वारंवार वाहतुकीसाठी बंद करावा लागत असल्याने आतील गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर आंबेनळी घाटातील अनेक ठिकाणी माती व दगड रस्त्यावर आल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य असला तरी घाट बंद झाल्यानंतर कोयना खोऱ्यातील ५४ गावांसाठी पर्यायी मार्ग कोणता, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आंबेनळी घाट बंद झाल्यानंतर महाबळेश्वरशी संपर्क तुटल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना तसेच आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांना बसतो. शेतीमाल आणि दुधाचा पुरवठा विस्कळीत होतो, विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होते, तर वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत उपचार मिळवणे कठीण बनते. त्यामुळे घाट बंद होणे म्हणजे केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी गंभीर परिस्थिती असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
जुलै २०२१-२२ मधील अतिवृष्टीदरम्यान आंबेनळी घाट दीर्घकाळ बंद राहिल्याची घटना आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्या काळात कोयना खोऱ्यातील अनेक गावांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. भविष्यातही अशा नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकतात, याची जाणीव लक्षात घेता कायमस्वरूपी पर्यायी संपर्कमार्गाची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मांघर–दुधगाव रस्ता हा पर्याय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी या मार्गाचा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते, तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा सर्वेक्षण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाई, आवश्यक परवानग्यांचा अभाव आणि प्रभावी पाठपुराव्याअभावी हा महत्त्वाचा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे.
स्थानिकांच्या मते, मांघर–दुधगाव रस्ता अस्तित्वात आल्यास सध्याचे सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर केवळ ११ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे महाबळेश्वर आणि कोयना खोऱ्यातील गावांमधील संपर्क अधिक सुलभ होईल. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध राहिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
या मार्गाचा फायदा प्रतापगड, वाडा-कुंभरोशी, दरे, जावळी, हरोशी, पार, कुमठे, कोंडोशी, दुधोशी, बिरवाडी, गोरोशी, दुधगाव, झांझवड, देवळी, कळमगाव, कोट्रोशी, आमशी, वेळापूर, चतुरबेट, दाभे, खरोशी, रुळे, आवळण, वाळणे, गाढवली, पिंपरी तांब यांसह एकूण ५४ गावांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. या गावांमध्ये सुमारे दोन ते अडीच हजार कुटुंबे वास्तव्यास असून त्यांचे शिक्षण, रोजगार, शेती आणि आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वरशी जोडलेल्या आहेत.
विशेष म्हणजे पावसाळ्यात आंबेनळी घाटातील वाहतूक विस्कळीत होणे आणि पार येथील ऐतिहासिक पुलावरून पाणी जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या गावांचा संपर्क तात्पुरता तुटण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते. त्यामुळे पर्यायी रस्त्याची मागणी आता केवळ विकासकामापुरती मर्यादित राहिलेली नसून ती जीवनावश्यक गरज बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि धोरणकर्त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे. मांघर–दुधगाव रस्त्यासाठी आवश्यक वन आणि प्रशासकीय परवानग्या मिळवून प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"आता केवळ आश्वासने नकोत, कृती हवी आहे," अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून आंबेनळी घाट बंद झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मांघर–दुधगाव पर्यायी मार्गाचा प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडवावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
Comments
Post a Comment