अखेर आंबेनळी घाट चार दिवसांसाठी संपूर्ण वाहतुकीस बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
अखेर आंबेनळी घाट चार दिवसांसाठी संपूर्ण वाहतुकीस बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
पोलादपूर | प्रतिनिधी
अतिवृष्टीचा वाढता धोका, घाट परिसरातील सातत्याने घडणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना आणि पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता रायगड जिल्हा प्रशासनाने अखेर महत्त्वाचा निर्णय घेत पोलादपूर–महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. दि. ३ जुलै २०२६ ते दि. ७ जुलै २०२६ या कालावधीत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, आंबेनळी घाट हा सह्याद्री पर्वतरांगांतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण आणि उच्च जोखमीचा घाट विभाग मानला जातो. पावसाळ्याच्या काळात या भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने दरडी कोसळणे, दगड घसरणे, भूस्तर खचणे आणि रस्त्यावर मातीचा मलबा साचणे अशा घटना सातत्याने घडत असतात.
विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात पोलादपूर हद्दीत दोन वेळा मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे या मार्गावरील प्रवास आणखी धोकादायक बनला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे.
आंबेनळी घाटाचा मोठा भाग तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर आणि दाट जंगल क्षेत्रातून जातो. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात कोणतीही पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
प्रशासनाच्या माहितीनुसार, घाट परिसरात संरक्षण भिंती, क्रॅश बॅरिअर्स, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर सुरक्षाविषयक कामे सुरू असली तरी अत्यंत प्रतिकूल हवामानात नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, घाट बंदीच्या कालावधीत पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महाड–माणगाव–ताम्हिणी घाट मार्ग किंवा पोलादपूर–चिपळूण–कराड मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
आंबेनळी घाट हा महाबळेश्वर आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्यामुळे घाट बंदीमुळे पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच मालवाहतूक वाहनांवर परिणाम होणार असला तरी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाची परिस्थिती आणि घाट परिसरातील सुरक्षेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment