महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ कोरडी; आटलेल्या कोयना नदीने तापोळा परिसरात निर्माण केले भीषण संकट
महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ कोरडी; आटलेल्या कोयना नदीने तापोळा परिसरात निर्माण केले भीषण संकट
शिवसागर जलाशयातील पाणीसाठा ११ टीएमसीवर; बोट सेवा बंद, पर्यटन ठप्प, नागरिकांची पायपीट वाढली
तापोळा प्रतिनिधी :
महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखली जाणारी कोयना नदी आणि शिवसागर जलाशय यंदा अभूतपूर्व पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात असल्याचे गंभीर चित्र तापोळा परिसरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा भागात नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आटल्याने स्थानिक नागरिक, पर्यटक, शेतकरी आणि बोट व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे.
शिवसागर जलाशयातील पाणीसाठा केवळ ११ टीएमसीपर्यंत खाली आल्याने अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी धोकादायकरीत्या घटली आहे. एकेकाळी अथांग जलसाठ्याने भरून वाहणाऱ्या कोयना नदीच्या पात्रात आता मोठमोठे दगड, चिखलाचे पट्टे आणि उघडे पडलेले किनारे दिसत आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नदीचे सौंदर्य हरवत चालले असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या बोट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने तापोळा परिसरातील पर्यटन व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटकांनी गजबजणारा परिसर सध्या ओसाड पडलेला दिसत आहे. बोटिंग, जलपर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्यावर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक आणि पर्यटनाशी संबंधित अनेकांचे उत्पन्न थांबले आहे.
पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने तापोळा परिसरातील अनेक गावांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पूर्वी बोटीच्या माध्यमातून सहज पार होणारे अंतर आता नागरिकांना पायी पार करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांत पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून बदलते हवामान, अपुरा पाऊस, वाढते तापमान आणि जलव्यवस्थापनातील त्रुटी यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. कोयना नदी ही केवळ जलस्रोत नसून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाची जीवनवाहिनी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “कोयना नदीचे कोरडे पडलेले पात्र पाहून मन विषण्ण होते. या नदीवर हजारो कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे. पाणी व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन धोरण, पर्यायी वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि पर्यटन व्यवसायाला आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उतेकर म्हणाले, “शिवसागर जलाशयातील कोयना नदीमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अत्यंत मोठ्या प्रमाणात पाणी कमी झाल्याने तापोळा व परिसरातील नागरिकांना अनेक गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून बोटिंग व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून अनेक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षातील तब्बल अकरा महिने पाण्यावर अवलंबून असलेला हा भाग शेवटच्या एका महिन्यात मात्र गंभीर संकटात सापडतो. नेमकी ज्या काळात पर्यटकांची व स्थानिकांची सर्वाधिक गरज असते, त्याच वेळी पाणी कमी होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस पाणी धोरण निश्चित करावे आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत पाणी कायम ठेवण्याची व्यवस्था करावी. अन्यथा येथील स्थानिक नागरिक, बोट व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित हजारो कुटुंबांना मोठ्या आर्थिक व सामाजिक संकटाला सामोरे जावे लागेल.”
कोयना नदीच्या आटलेल्या पात्राने आणि शिवसागर जलाशयातील झपाट्याने घटणाऱ्या पाणीसाठ्याने तापोळा परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आता सर्वांच्या नजरा आगामी पावसाकडे लागून राहिल्या आहेत.
Comments
Post a Comment