कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ‘मिसाईल मॅन’चा फलक; महाबळेश्वरमध्ये राष्ट्रपुरुषांचा अवमान, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ‘मिसाईल मॅन’चा फलक; महाबळेश्वरमध्ये राष्ट्रपुरुषांचा अवमान, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरात देशाच्या अभिमानास ठरलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाचा फलक चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेला आढळून आल्याने संतापाची लाट उसळली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि कोट्यवधी युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कलाम यांच्या नावाचा फलक अशा अपमानास्पद अवस्थेत दिसून आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हा प्रकार केवळ एका फलकाचा नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या भावना दुखावणारा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळी राष्ट्रपुरुषांच्या नावाचा फलक कचऱ्यात पडलेला दिसणे ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब मानली जात आहे. देशासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या आणि भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉ. कलाम यांच्या नावाचा फलक नेमका कचऱ्यात कसा पोहोचला, तो कोणी फेकला आणि यासाठी जबाबदार कोण, असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर संबंधित विभागातील अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संशय अधिकच बळावत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामान्य नागरिकांकडून राष्ट्रीय प्रतीकांचा अथवा सार्वजनिक मालमत्तेचा अवमान झाला असता तर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली असती. मात्र राष्ट्रपुरुषांच्या नावाच्या फलकाबाबत घडलेल्या या गंभीर प्रकारात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते देशातील युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणास्थान होते. साधी राहणी, उच्च विचार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि राष्ट्रभक्ती यामुळे त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा फलक कचऱ्यात पडलेला आढळणे म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा अभाव असल्याची टीका आता होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि युवकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संबंधित फलक तात्काळ सन्मानपूर्वक पूर्ववत लावण्यात यावा, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नागरिकांकडून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “स्वच्छता, सुशासन आणि देशभक्तीचे धडे देणाऱ्या महापुरुषांच्या नावाचा फलकच कचऱ्यात पडलेला असेल तर ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया
“डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताच्या स्वप्नांचे प्रतीक होते. त्यांच्या नावाचा फलक कचऱ्यात पडणे ही अत्यंत संतापजनक आणि वेदनादायक बाब आहे. प्रशासनाने दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी वाढेल.”
Comments
Post a Comment