'माझं गाव माझी बातमी’च्या वृत्ताची दखल; कॅनॉट पीक वनक्षेत्रातील काचा व मद्याच्या बाटल्यांचा खच हटवून वन विभागाची तात्काळ स्वच्छता मोहीम
'माझं गाव माझी बातमी’च्या वृत्ताची दखल; कॅनॉट पीक वनक्षेत्रातील काचा व मद्याच्या बाटल्यांचा खच हटवून वन विभागाची तात्काळ स्वच्छता मोहीम
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न कॅनॉट पीक परिसरातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचा आणि रिकाम्या बाटल्या विखुरलेल्या असल्याचा गंभीर प्रकार ‘माझं गाव माझी बातमी’ने उजेडात आणल्यानंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. जंगल परिसरात पसरलेल्या काचा, मद्याच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला असून या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेमुळे महाबळेश्वरची ओळख देशभर आहे. कॅनॉट पीक हा महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असून या परिसरात घनदाट जंगल, विविध प्रकारच्या वनस्पती आणि अनेक वन्यजीवांचे अधिवास आहेत. मात्र याच वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात फुटलेल्या काचा विखुरलेल्या असल्याचे चित्र समोर आल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती.
फुटलेल्या काचांमुळे वन्यप्राण्यांच्या पायांना गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला होता. माकडे, ससे, साळिंदर तसेच इतर लहान-मोठे वन्यजीव या परिसरात मुक्तपणे संचार करतात. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. याशिवाय पर्यटक आणि स्थानिक नागरिक जंगल परिसरातून फिरताना अपघात होण्याची शक्यता होती. उन्हाळ्यात काचांच्या तुकड्यांमुळे जंगलात आग लागण्याचाही संभाव्य धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
‘माझं गाव माझी बातमी’ने हा प्रश्न ठळकपणे मांडल्यानंतर वन विभागाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत जंगल परिसरातील काचा, मद्याच्या बाटल्या आणि अन्य टाकाऊ साहित्य गोळा करून परिसर स्वच्छ केला. या कारवाईमुळे वनक्षेत्रातील संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाबळेश्वरचे वनवैभव जपण्याची जबाबदारी केवळ वन विभागाची नाही, तर स्थानिक नागरिकांचीही आहे. बाहेरून येणारे पर्यटक अशा प्रकारे जंगलात मद्याच्या बाटल्या किंवा कचरा टाकताना फारसे आढळत नाहीत. अनेकदा स्थानिक पातळीवरच अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारून अशा कृत्यांना आळा घालणे आवश्यक आहे. अन्यथा वन विभागाला कठोर कारवाई करावी लागेल.”
लांडगे यांनी पुढे सांगितले की, वनक्षेत्रात मद्यपान करणे, कचरा टाकणे किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्याही कृतीला अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाकडून नियमित गस्त वाढविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
महाबळेश्वर हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिक आणि पर्यटकाची सामूहिक जबाबदारी आहे. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे तात्पुरता प्रश्न निकाली निघाला असला तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जनजागृती, नियमित देखरेख आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नमूद केले आहे.
स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘माझं गाव माझी बातमी’च्या वृत्तामुळे प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली आणि वनक्षेत्रातील गंभीर पर्यावरणीय धोका दूर करण्यात यश आले. या घटनेमुळे जबाबदार पत्रकारिता, जनजागृती आणि प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment