दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री मुंबईकडे रवाना; दुर्गम भागातील २५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, शिक्षणाबाबत दिला मोलाचा संदेश
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री मुंबईकडे रवाना; दुर्गम भागातील २५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, शिक्षणाबाबत दिला मोलाचा संदेश
✍️ संतोष मालुसरे,
तापोळा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी दरे येथे अल्प मुक्काम व विश्रांतीसाठी आले होते. अत्यंत व्यस्त राजकीय आणि प्रशासकीय कामकाजातून वेळ काढत त्यांनी दरे येथे दोन दिवस विश्रांती घेतली. या काळात त्यांनी सार्वजनिक भेटीगाठी टाळून मर्यादित कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
दरे येथील मुक्कामादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीचे विधान परिषद उमेदवार धैर्यशील कदम यांची भेट घेतली. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा केली. याशिवाय इतर कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा सार्वजनिक भेटी न स्वीकारता त्यांनी पूर्णतः विश्रांतीवर भर दिला.
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईकडे रवाना झाले. मात्र रवाना होण्यापूर्वी त्यांनी दुर्गम कांदटी व कोयना विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या कार्यक्रमात तब्बल २५० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होणारा प्रवासाचा त्रास कमी व्हावा आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सायकल वितरणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाण्याचे आवाहन केले. "शाळा बुडवू नका, नियमित शिक्षण घ्या आणि आपल्या आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करा," असा प्रेमळ सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या साध्या आणि प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या सायकल वितरणामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment