हर घर जल’च्या घोषणेला हरताळ; जावली गावातील मधली वाडी आजही पाणीपुरवठ्यापासून वंचित विहिरीत साप पडल्याने पाणी दूषित; ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत विहीर केली स्वच्छ, कायमस्वरूपी पाणी योजनेची मागणी तीव्र
‘हर घर जल’च्या घोषणेला हरताळ; जावली गावातील मधली वाडी आजही पाणीपुरवठ्यापासून वंचित
प्रतापगड | प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील जावली गावाच्या मधली वाडी येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकताच येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत साप पडल्याने विहिरीतील संपूर्ण पाणी दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेला साप बाहेर काढत विहिरीतील संपूर्ण पाण्याचा उपसा केला. त्यानंतर विहीर पूर्णपणे कोरडी करून तिची स्वच्छता करण्यात आली. अनेक तासांच्या मेहनतीनंतर विहीर पुन्हा वापरासाठी तयार करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या घटनेमुळे वाडीतील पाणीटंचाई आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आजही मधली वाडीमध्ये शासकीय नळ पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे पोहोचलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना स्वतःच्या खर्चातून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. स्थानिकांनी वर्गणी गोळा करून एक सिंटेक्स टाकी आणि मोटर बसवली असून त्याच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.
देशभरात “हर घर जल”चा नारा दिला जात असताना महाबळेश्वर तालुक्यातील जावलीसारख्या ग्रामीण भागांमध्ये आजही नागरिकांना मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या डोंगराळ भागात अजूनही पाणीपुरवठ्याच्या सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
प्रशासनाने तातडीने या वस्तीची दखल घेऊन कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment