कुंभरोशी परिसरातील ग्रामस्थांशी मंत्री मकरंद आबा पाटील यांचा संवाद; पाणी, वीज, आरोग्य व रस्ते विकासाबाबत सकारात्मक आश्वासन
कुंभरोशी परिसरातील ग्रामस्थांशी मंत्री मकरंद आबा पाटील यांचा संवाद; पाणी, वीज, आरोग्य व रस्ते विकासाबाबत सकारात्मक आश्वासन
प्रतापगड | प्रतिनिधी
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी कुंभरोशी व परिसरातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधत स्थानिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. गावातील मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नामदार मकरंद आबा पाटील कुंभरोशी येथे आले होते. यावेळी त्यांनी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीण शेठ भिलारे, सचिन उतेकर, सखाराम ढेबे, तुकाराम मोरे (जावळी), गणपत मोरे (दरे), विश्वनाथ गायकवाड (दरे), लक्ष्मण तात्या मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संवादावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रस्त्यांची अवस्था तसेच विविध विकासकामांबाबतच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. विशेषतः पाचगणी ते प्रतापगड दरम्यान वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली. यावर बोलताना नामदार मकरंद आबा पाटील यांनी पाचगणी ते प्रतापगड या मार्गावर लवकरच अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बिरमणी गावातील नदीवरील जुना पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तो धोकादायक बनल्याची बाबही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. सामाजिक कार्यकर्ते सचिन उतेकर यांनी मंत्र्यांकडे नवीन पुलाची मागणी केली. यावर संबंधित विभागाकडून तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिले.
कुंभरोशी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ग्रामीण आरोग्य केंद्राबाबतही मंत्री मकरंद आबा पाटील यांनी स्वतः माहिती घेतली. संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जातील, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय परिसरात नवीन ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग आणि राज्यमार्गांचे जाळे विकसित करण्याच्या योजनेवरही त्यांनी ग्रामस्थांसोबत सविस्तर चर्चा केली. दुर्गम भागातील संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पर्यटनास चालना देण्यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
कुंभरोशी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबतही यावेळी जोरदार चर्चा झाली. संबंधित ठेकेदारांकडून कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी मंत्र्यांसमोर मांडली. काही ठिकाणी कामांची गती मंदावल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कामांना गती देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्री मकरंद आबा पाटील यांनी ग्रामस्थांशी साधलेल्या या संवादामुळे परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, विविध विकासकामांना येत्या काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment