नानेगावची समृद्धीकडे दमदार वाटचाल; पंचायतराज अभियानात आदर्श कामगिरी
नानेगावची समृद्धीकडे दमदार वाटचाल; पंचायतराज अभियानात आदर्श कामगिरी
सातारा प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळत असून लोकसहभागातून विकासाची चळवळ अधिक गतिमान होताना दिसत आहे. पाटण तालुक्यातील नानेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांसाठी आदर्श निर्माण केला आहे. गावातील एकजूट, सुयोग्य नियोजन आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे नानेगाव समृद्धीकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे मत सहाय्यक गटविकास अधिकारी वसंतराव धनावडे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींचे सात विविध घटकांवर मूल्यमापन केले जात असून नानेगाव ग्रामपंचायतीने या सर्वच घटकांमध्ये प्रभावी कामगिरी नोंदवत गुणांकनात भक्कम स्थान निर्माण केले आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी एकदिलाने सहभाग घेतल्यामुळे विकासकामांना विशेष गती मिळाली आहे. स्वच्छता अभियान, नियमित पाणीपुरवठा, कर वसुलीतील सुधारणा, वृक्षसंवर्धन उपक्रम, नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी, अभिलेख व्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ गावापर्यंत पोहोचवण्यात नानेगाव पुढे असल्याचे दिसून आले.
स्पर्धेच्या अनुषंगाने पाटण पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायतीत सखोल तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय कामकाजाची शिस्त, विकासकामांची गुणवत्ता तसेच योजनांच्या अंमलबजावणीचा बारकाईने आढावा घेण्यात आला. तज्ञांच्या पथकाने अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त गुणांकन मिळवण्यासाठी आवश्यक सूचना देत ग्रामपंचायतीला मार्गदर्शन केले.
या प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावाच्या विकासासाठी सर्व स्तरांवरून मिळालेला हा पाठिंबा नानेगावच्या यशामागील मुख्य बळ ठरत आहे.
नानेगावच्या या यशस्वी वाटचालीमुळे इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून लोकसहभाग, पारदर्शक कारभार आणि विकासाभिमुख नियोजन यांच्या जोरावर ग्रामीण भागातही समृद्धी साध्य होऊ शकते, याचा ठोस प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
Comments
Post a Comment