“आमच्या हक्काचा पैसा द्या... नाहीतर आमच्या समाध्या बांधा!” — निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याच्या पत्नीची सरकारकडे हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक
“आमच्या हक्काचा पैसा द्या... नाहीतर आमच्या समाध्या बांधा!” — निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याच्या पत्नीची सरकारकडे हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक
मुंबई प्रतिनिधी :
ही केवळ एक तक्रार नाही, तर आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या वेदनेचा टाहो आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमात तब्बल २८ वर्षे सेवा बजावलेल्या निवृत्त बस वाहकाच्या कुटुंबाला आज स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त बेस्ट कर्मचारी महेश सदाशिव दाभोळकर यांच्या पत्नी सौ. छाया महेश दाभोळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भावनिक आणि हृदयद्रावक पत्राद्वारे न्यायाची याचना केली आहे.
“आमच्या हक्काचा पैसा द्या, नाहीतर मुंबईच्या मुख्य चौकात आमच्या समाध्या बांधा,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली आहे. त्यांच्या या पत्रामुळे बेस्टमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रात छाया दाभोळकर यांनी नमूद केले आहे की, त्यांचे पती महेश दाभोळकर यांनी १९९२ च्या मुंबई दंगलींपासून ते कोरोना महामारीच्या कठीण काळापर्यंत जीवाची पर्वा न करता मुंबईकरांची सेवा केली. शहरातील लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत राहावे यासाठी त्यांनी दिवस-रात्र कष्ट घेतले. “मुंबई धावत राहिली कारण माझ्या पतीसारख्या हजारो कामगारांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले,” असे त्या भावनिक शब्दांत सांगतात.
मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सेवा निवृत्तीनंतर मिळणाऱ्या केवळ चार हजार रुपयांच्या अपुऱ्या पेन्शनवर वृद्ध दाम्पत्याचा उदरनिर्वाह होत आहे. औषधोपचाराचा खर्च भागविणेही कठीण झाले असून, घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे पतीच्या ग्रॅच्युइटी आणि रजा रोखीकरणाचे लाखो रुपये गेली सात ते आठ वर्षे प्रलंबित असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
“ज्या हातांनी मुंबईला सावरलं, तेच हात आज औषधांसाठी थरथरत आहेत,” अशी अंतःकरण हेलावून टाकणारी भावना त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. आर्थिक विवंचनेमुळे पती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचले असून, कुटुंबावर नैराश्याचे सावट पसरल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या आर्थिक संकटाचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या मुलींवर झाला आहे. पैशाअभावी मुलींची लग्ने रखडली असून, समाजातील टोमणे आणि अपमान सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “स्वतःच्या लेकीला अशा परिस्थितीत कोमेजताना पाहणे म्हणजे जिवंतपणी मरण अनुभवण्यासारखे आहे,” असे अत्यंत भावनिक शब्द त्यांनी पत्रात लिहिले आहेत.
सरकारने जर आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच त्याच्या हक्काचा पैसा मिळवून देऊ शकत नसेल, तर मंत्रालयासमोर किंवा गेट वे ऑफ इंडिया येथे आमच्या समाध्या बांधा, अशी संतप्त मागणीही त्यांनी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, बेस्टमधील अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, निवृत्तीवेतनाशी संबंधित देयके आणि इतर आर्थिक लाभ रखडल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून, या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या पत्नीने व्यक्त केलेला हा आक्रोश आता केवळ एका कुटुंबाच्या वेदनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्क, सन्मान आणि जगण्याच्या अधिकाराशी निगडित प्रश्न बनला असून, शासन आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment