कर्तव्य, शिक्षण आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास; दुधगावच्या डॉ. कुलदीप यादव यांनी संपादन केली विधी पदवी
कर्तव्य, शिक्षण आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास; दुधगावच्या डॉ. कुलदीप यादव यांनी संपादन केली विधी पदवी
महाबळेश्वर | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील युवकाने जर जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांची कास धरली, तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण दुधगाव (ता. महाबळेश्वर) येथील सुपुत्र डॉ. कुलदीप शिवराम यादव यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिले आहे. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत त्यांनी आता विधी पदवी (एल.एल.बी.) संपादन करून आपल्या शैक्षणिक प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशामुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून युवक वर्गासाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
डॉ. कुलदीप यादव हे सन २००७ पासून पुणे येथील भारती रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे वरिष्ठ समाजकार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. रुग्णालयातील जबाबदारीचे काम प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच त्यांनी शिक्षणाची ओढ कायम जपली. नोकरी, सामाजिक जबाबदाऱ्या आणि अभ्यास यांचा समतोल राखत त्यांनी सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) या उच्च पदव्या यशस्वीरित्या प्राप्त केल्या आहेत. आता त्यांनी पुणे येथील न्यू लॉ कॉलेज मधून विधी शाखेचे शिक्षण पूर्ण करून विधी पदवी संपादन केली आहे.
डॉ. यादव यांचा शैक्षणिक प्रवास हा केवळ पदव्या मिळविण्यापुरता मर्यादित नसून त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक आणि आरोग्यविषयक विविध विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास करत अनेक संशोधन निबंध आणि लेख लिहिले आहेत. त्यांचे हे संशोधनपर लेख विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त शोधपत्रिकांमध्ये प्रकाशित झाले असून शैक्षणिक क्षेत्रात त्याची दखल घेतली गेली आहे.
विशेषतः आरोग्य क्षेत्रातील “चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य समस्या” या विषयावर त्यांनी केलेले संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या संशोधनाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्षित कर्मचाऱ्यांच्या अडचणी, त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न आणि जीवनमान यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला आहे. या विषयावरील त्यांचे संशोधनपर पुस्तकही प्रकाशित झाले असून ते सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रासाठी अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ मानले जात आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या एका युवकाने शिक्षणाच्या बळावर एवढे मोठे यश संपादन करणे ही बाब अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठीण परिस्थितीतही शिक्षणाची वाट न सोडता सातत्याने प्रगती साधणारे डॉ. कुलदीप यादव हे आजच्या युवकांसाठी आदर्श ठरत आहेत. “नोकरी करतानाही उच्च शिक्षण घेऊन समाजात वेगळी ओळख निर्माण करता येते,” हा सकारात्मक संदेश त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे.
डॉ. यादव यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारती विद्यापीठ चे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र-कुलगुरू तथा कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम तसेच भारती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Very nice achievement by Dr.Kuldeep. Also. sensetive document from prier trough Sondakar. Very nice journalism.
ReplyDelete