मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये डोंगर-दऱ्यांतून विकासाची सुवर्णझेप; मेटगुताड प्रथम, रामेघरची दुर्गमतेवर मात करत मानाच्या यादीत दमदार नोंद
समृद्ध पंचायतराज अभियानात महाबळेश्वरचा दबदबा; मेटगुताड प्रथम, रामेघर द्वितीय, विकासाच्या शर्यतीत तालुक्याची मान उंचावली
प्रतापगड प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. तालुकास्तरीय मूल्यमापनात मेटगुताड ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १५ लाख रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरले, तर दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या रामेघर ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत १२ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. या यशामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचा गौरव वाढला असून पंचायत समिती, जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण विकास विभागाकडून दोन्ही ग्रामपंचायतींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींचा कारभार अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने हे अभियान राबविले होते. यामध्ये कार्यालयांचे आधुनिकीकरण, आयएसओ मानांकन, करवसुली, डिजिटल सेवा, स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग अशा विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात आले.
या स्पर्धेत मेटगुताड ग्रामपंचायतीने सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. ग्रामपंचायत अधिकारी वैभव मारुती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसरपंच भिकन कोंडीबा बावळेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि विविध शासकीय यंत्रणांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी शक्य झाली. १०० टक्के करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत संकल्पना, महिला सक्षमीकरणासाठी राबविलेले उपक्रम, स्वच्छता आणि विकासकामांचे प्रभावी नियोजन यामुळे मेटगुताडने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले. या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जल्लोषात या यशाचे स्वागत केले.
दुसरीकडे, अतिदुर्गम आणि मर्यादित उत्पन्न असलेल्या रामेघर ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मोठ्या ग्रामपंचायतींना मागे टाकत रामेघरने मिळवलेले हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे नियोजनबद्ध कामकाज आणि प्रशासनाशी साधलेला समन्वय यामुळे ही कामगिरी शक्य झाली.
सरपंच सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विकासकामांना प्राधान्य देत गावातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. गावातील ज्येष्ठ नागरिक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सरपंच, मान्यवर नागरिक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या योगदानामुळे रामेघरने विकासाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल शासनाकडून ग्रामपंचायतीला १२ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
रामेघरच्या या यशामध्ये ग्रामपंचायत अधिकारी शेख अण्णासाहेब यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांनी ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न करत शासकीय योजनांचा प्रभावी पाठपुरावा केला. लोकांच्या समस्या समजून घेत विकासकामांना गती देणे, लोकसहभाग वाढविणे आणि ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे चालविणे यामुळे ग्रामपंचायतीला दुसऱ्यांदा मोठ्या पुरस्काराचा मान मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते म्हणाले, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मेटगुताड ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक आणि रामेघर ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, प्रभावी नियोजन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. विशेषतः दुर्गम भागातील रामेघरने मर्यादित साधनसामग्रीत मिळवलेले यश प्रेरणादायी असून इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.”
मेटगुताड आणि रामेघर या दोन्ही ग्रामपंचायतींच्या यशामुळे महाबळेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण विकास, लोकसहभाग आणि सक्षम प्रशासन यांच्या बळावर गावांचा कायापालट घडवून आणता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या या गावांनी मिळवलेले यश आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment