रस्त्यावर भरतो आठवडे बाजार; व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हालांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?वाहतूक कोंडी, गैरसोयी आणि मूलभूत सुविधांचा अभाव; महाबळेश्वरातील आठवडे बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रस्त्यावर भरतो आठवडे बाजार; व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हालांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?
वाहतूक कोंडी, गैरसोयी आणि मूलभूत सुविधांचा अभाव; महाबळेश्वरातील आठवडे बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
महाबळेश्वर | विशेष प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील आठवडे बाजार हा केवळ व्यापाराचा केंद्रबिंदू नसून ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा बाजार मुख्य रहदारीच्या रस्त्यावर भरत असल्याने व्यापारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.
दर बुधवारी भरत असलेल्या या बाजारात महाबळेश्वरसह जावली, तापोळा आणि परिसरातील ग्रामीण भागातून शेतकरी भाजीपाला, फळे आणि विविध कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. तसेच लहान व्यापारी आणि हातावर पोट असलेले विक्रेते आपल्या व्यवसायासाठी या बाजारावर अवलंबून आहेत. मात्र बाजार भरत असलेला परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण होते. पर्यटकांची गर्दी, रस्त्यावरील पार्किंग आणि बाजारातील गजबज यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना बाजारात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची खंतही व्यक्त होत आहे. बसण्यासाठी जागा नाही, स्वच्छतागृहांची कमतरता, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उघड्यावर व्यापार अशी परिस्थिती व्यापाऱ्यांना सहन करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकरी पहाटेपासून आपला माल घेऊन बाजारात येतात, मात्र दिवसभर उघड्यावर बसून व्यापार करावा लागत असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सूर्यकांत उर्फ बाळासाहेब पांचाळ यांनी या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले असून आठवडे बाजारासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा व्यापारी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी केली आहे. बाजाराचे योग्य नियोजन करून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना सुरक्षित व सुसज्ज जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडीही कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महाबळेश्वर हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी येथील आठवडे बाजारात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि छोटे व्यापारी हेच या बाजाराचे खरे आधारस्तंभ असताना त्यांच्या अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आठवडे बाजाराचा प्रश्न हा केवळ वाहतूक किंवा जागेचा नसून हजारो व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन व्यापारी आणि ग्रामस्थांना न्याय देणारा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment