बिरवाडी–फणसवाडी रस्त्याची दुरवस्था; डांबराचा थरच गायब, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास
बिरवाडी–फणसवाडी रस्त्याची दुरवस्था; डांबराचा थरच गायब, नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास
प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी ते फणसवाडी हा महत्त्वाचा ग्रामीण संपर्क रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे उखडून गेला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता खडबडीत आणि धोकादायक बनला आहे.
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची भीती कायम निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, रस्त्यावरील डांबर पूर्णतः निघून गेल्याने आता फक्त दगड, खड्डे आणि मातीच उरली आहे. अनेक ठिकाणी वाहनांना वेग कमी करून अत्यंत सावधगिरीने जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळही वाढत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बिरवाडी–फणसवाडी हा रस्ता ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गाने वाहतूक, दैनंदिन बाजारपेठ संपर्क तसेच आपत्कालीन सेवांसाठीही नागरिक अवलंबून आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment