शिवसागर जलाशयात भीषण दुर्घटना!सुसाट वादळात स्पीड बोट पलटी; पर्यटक दाम्पत्य बचावले, चालक रुपेश तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू
सुसाट वादळात स्पीड बोट पलटी; पर्यटक दाम्पत्य बचावले, चालक रुपेश तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू
प्रतापगड | वार्ताहर
सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या आणि ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा-बामनोली परिसरात बुधवारी (दि. १३) सायंकाळी घडलेल्या भीषण जलदुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. शिवसागर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पर्यटकांना घेऊन फिरत असलेली स्पीड बोट अचानक आलेल्या सुसाट वादळात पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मुंबईहून आलेले पर्यटक पती-पत्नी सुदैवाने बचावले, मात्र बोटीचा चालक रुपेश तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी त्यांचा मृतदेह शोधमोहीमेदरम्यान आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील एक पर्यटक दाम्पत्य तापोळा येथे पर्यटनासाठी आले होते. शिवसागर जलाशयातील बोटिंगचा आनंद घेण्यासाठी त्यांनी स्पीड बोटीतून फेरफटका सुरू केला होता. सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सोनाडी-सावरी पुलाजवळ बोट पोहोचली असताना अचानक हवामानात मोठा बदल झाला. काही क्षणांतच परिसरात सुसाट वादळी वारे सुरू झाले. जलाशयात मोठ्या लाटा निर्माण झाल्याने बोटीचा तोल गेला आणि बोट क्षणार्धात पलटी झाली.
दुर्घटना इतकी अचानक घडली की काही काळ पर्यटकांना काय झाले हे समजलेच नाही. मात्र सुदैवाने पर्यटक दाम्पत्याने लाईफ जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखत पाण्यात तरंगत स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान, परिसरातील इतर बोट चालक, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर पर्यटक दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
मात्र बोटीचा चालक रुपेश तांबे हे पाण्यात बेपत्ता झाले. रुपेश हे पोहण्यात तरबेज असल्याने त्यांनी किनाऱ्याकडे पोहत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु वादळाचा वेग अत्यंत जास्त असल्याने आणि जलाशयात मोठ्या लाटा निर्माण झाल्याने त्यांना किनाऱ्यापर्यंत पोहोचता आले नाही. काही वेळातच ते खोल पाण्यात बेपत्ता झाले.
घटनेनंतर संपूर्ण तापोळा-बामनोली परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत विविध बोट क्लब, स्थानिक ग्रामस्थ, बोट चालक आणि प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. मात्र अंधार, खोल पाणी आणि खराब हवामानामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
गुरुवारी सकाळपासून शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, संचालक मंडळ, स्थानिक नागरिक आणि बोट चालक यांनी सुमारे १५ बोटींच्या सहाय्याने पुन्हा व्यापक शोधमोहीम सुरू केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान एका बोटीच्या गळाला रुपेश तांबे यांचा मृतदेह लागला. हा मृतदेह महाबळेश्वर हद्दीत आढळून आला. त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यास देण्यात आली.
दरम्यान, दुर्घटनेच्या वेळी परिसरात आलेल्या जोरदार वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. अचानक बदललेल्या हवामानामुळेच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक चर्चा सुरू असली तरी नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. बोटीची क्षमता, सुरक्षेचे नियम, हवामानाचा अंदाज आणि आपत्कालीन साधनांची उपलब्धता याचीही तपासणी केली जात आहे.
तापोळा-बामनोली परिसरातील जलपर्यटन हे महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख पर्यटन आकर्षण मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे बोटिंगसाठी येत असतात. मात्र या दुर्घटनेमुळे जलपर्यटनाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हवामानाचा अचूक अंदाज, बोटींवरील सुरक्षा यंत्रणा, चालकांचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन बचावव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment