सावित्रीच्या खोऱ्यातून रेस्क्यू टीमची मोठी कामगिरी; आंबेनळी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश दाभिळ गावाच्या मार्गाने दरीच्या तळाशी पोहोचली बचाव पथके; उर्वरित पाच जणांसाठी शोधमोहीम सुरूच
सावित्रीच्या खोऱ्यातून रेस्क्यू टीमची मोठी कामगिरी; आंबेनळी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश
दाभिळ गावाच्या मार्गाने दरीच्या तळाशी पोहोचली बचाव पथके; उर्वरित पाच जणांसाठी शोधमोहीम सुरूच
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या अवघड बचाव मोहिमेत रविवारी आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या बाजूने दरीत प्रवेश केलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनापर्यंत पोहोचत तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. यापूर्वी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित पाच जणांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
आंबेनळी घाटातील कुंभरोशीजवळील पोलादपूर हद्दीत पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच विविध स्वयंसेवी बचाव संस्थांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून गेल्या अनेक तासांपासून कठीण परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे.
प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी जीवाची पर्वा न करता खोल दरीत उतरून शोधमोहीम राबविली. दरीची प्रचंड खोली, निसरडे कडे, दाट जंगल आणि धोकादायक भौगोलिक परिस्थितीमुळे सुरुवातीचे प्रयत्न अत्यंत आव्हानात्मक ठरले. मात्र दोन मृतदेह बाहेर काढल्यानंतर उर्वरित मृतदेह ज्या भागात अडकले होते त्या ठिकाणी वरून पोहोचणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने बचाव पथकांनी नवी रणनीती आखली.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या दिशेने दरीत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्यायी मार्गाने बचाव पथके दरीच्या तळाशी आणि अपघातग्रस्त वाहनाजवळ पोहोचली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहनाजवळून तिसरा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या यशामुळे उर्वरित पाच जणांपर्यंत पोहोचण्याची आशा अधिक बळावली आहे.
सावित्री नदीकाठचा परिसर अत्यंत दुर्गम असून खडकाळ रचना, दाट झाडी आणि धोकादायक उतारांमुळे प्रत्येक पाऊल टाकताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. तरीही बचाव पथके सातत्याने प्रयत्नशील असून आवश्यक दोरखंड, स्ट्रेचर आणि इतर तांत्रिक साधनसामग्रीच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवले आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवले आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधत बचावकार्य अधिक प्रभावी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहनातील रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, करण आनंद शिंगटे, निखिल अभिमन्यू शिंगटे, संदीप अशोक काटकर आणि अंश समीर चव्हाण हे युवक असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत ओळख आणि पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील माहिती जाहीर केली जाणार आहे.
आंबेनळी घाटातील या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हळहळ व्यक्त करत असून दरीच्या तळाशी सुरू असलेल्या या कठीण मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाल्यानंतर बचाव पथकांचा उत्साह वाढला असून उर्वरित पाच जणांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी रेस्क्यू टीमचे सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment