महाबळेश्वर ग्रामसभेत वाहतूक व पोलिस कारभारावर संतापाचा उद्रेक; “दंड नव्हे, समन्वय हवा” नागरिकांची प्रशासनाला ठणकावणी
महाबळेश्वर ग्रामसभेत वाहतूक व पोलिस कारभारावर संतापाचा उद्रेक; “दंड नव्हे, समन्वय हवा” नागरिकांची प्रशासनाला ठणकावणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पर्यटननगरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शहरात वाहतूक कोंडी, पोलिसांची दंडात्मक कारवाई, पर्यटकांना होणारा त्रास, वीजपुरवठ्यातील व्यत्यय आणि मूलभूत सुविधांच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये वाढत चाललेला असंतोष अखेर ग्रामसभेत उफाळून आला. ग्रामसभेत उपस्थित नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत वाहतूक व्यवस्थापनाच्या नावाखाली सुरू असलेल्या दंडात्मक कारवायांवर कठोर प्रश्न उपस्थित केले. परिस्थितीत लवकर सुधारणा झाली नाही तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
ग्रामसभेत राजेश कुंभारदरे, डी. एम. बावळेकर, गिरीश नायडू, अंकित पलोड, यशवंत घाडगे, राजा गुजर, लक्ष्मण कोंढाळकर, अमित ढेबे, प्रशांत भोईटे, युसूफ शेख, चिन्मय आगरकर, सतीश ओंबळे, सनी अरोरा, विशाल तोष्णिवाल, लिलाताई शिंदे, विजय भिलारे, समीर सुतार, सी. डी. बावळेकर, शंकर ढेबे, राजेंद्र धोत्रे, खामकर, पूजा उतेकर, वृषाली डोईफोडे, संदीप केंडे, ज्योती वागदरे, राणी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या परिसरातील आणि शहरातील विविध समस्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
माजी नगराध्यक्ष युसूफ शेख यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पर्यटकांना विनाकारण अडवून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. “महाबळेश्वर हे पर्यटनावर अवलंबून असलेले शहर आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांशी सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यांना त्रास देणारी अडवणूक आणि अनावश्यक कारवाई थांबवली पाहिजे,” असे ते म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनीही वाहतूक व्यवस्थापनाच्या सध्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “जॅमर लावून वाहनचालकांना अडवले जाते. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. या संपूर्ण विषयावर उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) यांना ग्रामसभेत बोलावून सविस्तर चर्चा व्हावी. तसेच संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे यांनी वाहतूक व पोलिस कारभारावर सडकून टीका केली. “पसरणी घाटापासूनच पर्यटकांची लूट सुरू होते अशी भावना निर्माण झाली आहे. वाहतुकीची समस्या कायम आहे, पण दंडात्मक कारवायांचा जोर वाढलेला दिसतो. बाजारपेठेत ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचीही योग्य व्यवस्था नाही. पर्यटननगरीच्या दृष्टीने या गोष्टी लाजिरवाण्या आहेत. प्रशासनाने आता ठोस आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वरमधील मॅप्रो परिसर, वेण्णा लेक, बसवेश्वर महाराज चौक, बाळासाहेब ठाकरे चौक यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून अन्यायकारक दंड आकारला जात असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला. टोईंग व्हॅनद्वारे वाहने उचलली जात असताना अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक अथवा आवश्यक सूचना नसल्याची तक्रार करण्यात आली. वाहतूक आराखड्यावर नगरपरिषदेत चर्चा झाली असली तरी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात आले नाही, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.
अंकित पलोड यांनी मोबाईलवर छायाचित्र काढून थेट दंडाची पावती देण्याच्या प्रकारावर आक्षेप घेतला. “नागरिकांना किंवा पर्यटकांना योग्य माहिती न देता थेट कारवाई केली जाते. जनजागृतीपेक्षा दंडावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसते,” असे त्यांनी नमूद केले. समीर सुतार यांनी वाहन तपासणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, “गोव्यासारख्या राज्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी केली जाते, परंतु महाबळेश्वरमध्ये चिक्की किंवा चणे घेऊन जाणाऱ्या पर्यटकांनाही अडवले जाते. यामागील नेमके कारण काय?” असा सवाल उपस्थित केला.
गोपाळ लालबेग यांनी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मान्य करतानाच तिचे स्वरूप महसुली वसुलीसारखे नसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मस्जिद रोड परिसरात वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध असतानाही हॉटेलसमोर वाहन उभे करण्यास मज्जाव केला जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी मांडली.
ग्रामसभेत उपस्थित ट्रॅफिक पोलिस कर्मचारी किरण चव्हाण आणि वैभव भिलारे यांनी नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. मात्र उपस्थितांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख अनुपस्थित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “ग्रामसभा ही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे. अशा बैठकींना अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर प्रशासनाला ग्रामसभेचे गांभीर्य नाही, असेच म्हणावे लागेल,” अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.
वाहतूक प्रश्नाबरोबरच इतर नागरी सुविधांबाबतही अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. पेट्रोल पंपांवर ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसणे, अपुरे कर्मचारी, सेवा वेळ वाढविण्याची गरज, मानकर परिसरातील गटारे गायब होणे, पर्यटन हंगामात वारंवार होणारी वीज खंडितता, तसेच वेण्णा लेक ते महाबळेश्वर शहर मार्गावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
ग्रामसभेच्या चर्चेचा सूर स्पष्टपणे प्रशासनाला जाग आणणारा होता. वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ दंड आणि कारवाई करून सुटणार नाही, तर पोलिस विभाग, नगरपरिषद, व्यापारी संघटना, स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे आवश्यक आहे, असे एकमुखी मत व्यक्त करण्यात आले. पर्यटकांना दिलासा देणारी, स्थानिकांच्या अडचणी समजून घेणारी आणि शहराच्या पर्यटन प्रतिमेला पूरक अशी सकारात्मक भूमिका प्रशासनाने स्वीकारावी, अशी जोरदार मागणी ग्रामसभेतून करण्यात आली. महाबळेश्वरच्या भविष्यासाठी वाहतूक, सुविधा आणि प्रशासनातील समन्वय या तिन्ही बाबींवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या ग्रामसभेतून अधोरेखित झाले.
Comments
Post a Comment