महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला मानधन व भरतीत आरक्षणाची मागणी
दोन दशकांची निस्वार्थ समाजसेवा; आधुनिक बचाव साहित्याबरोबरच स्वयंसेवकांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर परिसरातील कोणतीही दुर्घटना, खोल दरीतील अपघात, हरवलेल्या व्यक्तींचा शोध किंवा नैसर्गिक आपत्तीची घटना घडली की सर्वप्रथम मदतीसाठी धावून येणारे नाव म्हणजे महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम. गेल्या जवळपास दोन दशकांपासून ही टीम कोणत्याही शासकीय लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहे. मात्र जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या या स्वयंसेवकांना आजही आवश्यक साधनसामग्री, आर्थिक आधार आणि शासकीय सन्मानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर, प्रतापगड आणि आंबेनळी घाट परिसरातील अनेक भीषण दुर्घटनांमध्ये या टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शेकडो फूट खोल दऱ्यांमध्ये उतरून जखमींना बाहेर काढणे, मृतदेहांचा शोध घेणे, जंगलामध्ये हरवलेल्या व्यक्तींचा माग काढणे, पूरग्रस्त भागात मदतकार्य करणे अशा अत्यंत धोकादायक मोहिमा या स्वयंसेवकांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. अनेकदा रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहिमांमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
अलीकडील आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेतही या टीमने दाखवलेले धाडस आणि अथक परिश्रम संपूर्ण राज्याने पाहिले. अशा प्रत्येक वेळी समाजातून त्यांच्या कार्याचे कौतुक होते, मदतीच्या घोषणा दिल्या जातात आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याची आश्वासने दिली जातात. मात्र काही दिवसांनंतर त्या घोषणा हवेत विरून जातात आणि प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही, अशी भावना टीमच्या सदस्यांमध्ये आहे.
बचावकार्य अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आधुनिक दोरखंड प्रणाली, रेस्क्यू स्ट्रेचर, ड्रोन, अत्याधुनिक सर्च लाईट्स, कम्युनिकेशन उपकरणे, हेल्मेट, सुरक्षा किट्स आणि इतर आवश्यक साहित्याची नितांत गरज असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. या साधनांअभावी अनेक मोहिमा अधिक कठीण बनतात. तरीही समाजसेवेच्या भावनेतून हे स्वयंसेवक आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण मागणी पुढे आणली आहे. "माझं गाव माझी बातमी"शी बोलताना त्यांनी सांगितले की, समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या स्वयंसेवकांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या अशा प्रशिक्षित आणि अनुभवी जवानांना शासकीय भरती प्रक्रियेत विशेष आरक्षण किंवा प्राधान्य दिले जावे. तसेच त्यांच्या सेवेला मान्यता देत किमान मानधनाची व्यवस्था शासनाने सुरू करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कात्रट यांनी पुढे सांगितले की, जे युवक कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धोकादायक परिस्थितीत उतरतात, त्यांची दखल घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला होऊ शकतो. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण, विमा संरक्षण, आधुनिक साहित्य आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे कार्य हे केवळ एका संस्थेपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षेशी निगडित आहे. या स्वयंसेवकांच्या धाडसामुळे अनेक कुटुंबांना आपल्या प्रियजनांचा जीव वाचलेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या टीमला आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या स्वयंसेवकांना केवळ कौतुकाची थाप नव्हे, तर प्रत्यक्ष मदत, शासकीय संरक्षण आणि भविष्यासाठी आधार मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत आता सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment