“स्वच्छ पाणी… सुरक्षित आरोग्य” : घावरी गावाला वॉटर फिल्टर सिस्टीमची अमूल्य भेट; समाजसेवक चंदन चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम
“स्वच्छ पाणी… सुरक्षित आरोग्य” : घावरी गावाला वॉटर फिल्टर सिस्टीमची अमूल्य भेट; समाजसेवक चंदन चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे घावरी येथे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित आरोग्य या मूलभूत गरजेला केंद्रस्थानी ठेवत एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने युवा उद्योजक (इटली) व समाजसेवक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण यांनी शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत घावरीस वॉटर फिल्टर सिस्टीम प्रदान केली. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यदृष्टीने एक मोठा दिलासा मिळाला असून, “स्वच्छ पाणी… सुरक्षित आरोग्य” हा संदेश प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई मंडळाच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण भगवान सकपाळ, श्री. प्रकाश किसन सकपाळ, प्रमुख सल्लागार श्री. तानाजी लक्ष्मण सकपाळ, श्री. रमेश गणपत सकपाळ तसेच इतर कार्यकर्त्यांनी “आपला गाव… आपलं आरोग्य” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गावासाठी वॉटर फिल्टर सिस्टीमची मागणी केली होती. या मागणीला श्री. शैलेश शिंदे यांनी मान्यता देत प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यापूर्वीही समाजसेवक चंदन चव्हाण यांनी घावरी गावासाठी सौरऊर्जेवर चालणारे दिवे उपलब्ध करून देत “गाव अंधारातून… प्रकाशाकडे” नेण्याचे कार्य केले होते. त्यामुळे त्यांच्या समाजसेवेचा ठसा अधिक दृढ झाला असून, गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान सातत्याने अधोरेखित होत आहे.
सदर वॉटर फिल्टर सिस्टीम बसविण्याच्या वेळी ग्रामपंचायत घावरीचे उपसरपंच श्री. विजय सावजी सकपाळ, पोलिस पाटील यास्मिन आरिफ शारवान, जेष्ठ कार्यकर्ते श्री. राजाराम धारू सकपाळ, श्री. नारायण हरिश्चंद्र सकपाळ, श्री. किसन बाबू सकपाळ, श्री. किसन मालु जाधव, श्री. सोमाजी कोंडीबा सकपाळ, श्री. प्रकाश नामदेव सकपाळ, श्री. तुकाराम राजाराम सकपाळ तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाट गावचे समाजसेवक श्री. विठ्ठल कदम यांनीही या उपक्रमासाठी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घावरी ग्राम सेवा संघ मुंबई मंडळाचे हिशेब तपासणी श्री. किसन शांताराम जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या सेवाभावी उपक्रमामुळे घावरी गावासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात समाजसेवक चंदन चव्हाण यांच्या कार्याची जोरदार चर्चा सुरू असून, ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला बळकटी मिळणार असून, हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment