“महाबळेश्वरच्या पाणीटंचाईवर निर्णायक पाऊल? उद्या मंत्री ना.मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक”
“महाबळेश्वरच्या पाणीटंचाईवर निर्णायक पाऊल? उद्या मंत्री ना.मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक”
पाचगणी प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येसह ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न आणि शहराच्या पायाभूत सुविधांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी उद्या बुधवारी महाबळेश्वर येथे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यावर तत्काळ उपाययोजना सुचवण्याची ही मोठी संधी असल्याचे पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले यांनी नमूद केले.
महाबळेश्वर येथील हॉटेल गौतम येथे दुपारी १ वाजता ही बैठक पार पडणार असून, तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी, विविध विकास योजनांचे संबंधित यंत्रणा प्रमुख आणि स्थानिक प्रशासन या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. डोंगराळ व दुर्गम भौगोलिक रचनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावे दरवर्षी पाणीटंचाईच्या विळख्यात सापडतात. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी जलव्यवस्थापन, नवीन जलस्रोतांचा शोध, विद्यमान स्रोतांचे पुनर्भरण, तसेच टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन यावर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य केंद्रांमधील अपुऱ्या सुविधा, शाळांमधील अडचणी, वीजपुरवठा, तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांवरही या बैठकीत विस्तृत आढावा घेतला जाणार आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा प्रगती अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून सादर केला जाणार असून, रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी मंत्री मकरंद आबा पाटील थेट सूचना व मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, या बैठकीला महाबळेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिकांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करून विकासकामांना गती देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना यांसह या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment