तलाठी कार्यालयातील गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांना दोन महिन्यांपासून हेलपाटे, प्रशासनाकडे कारवाईची मागणी
तलाठी कार्यालयातील गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह; नागरिकांना दोन महिन्यांपासून हेलपाटे, प्रशासनाकडे कारवाईची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी आणि बिरवाडी सजामध्ये महसूल प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. संबंधित सजासाठी नियुक्त असलेल्या तलाठी श्रीमती भोसले यांच्या वतीने प्रत्यक्ष कामकाज त्यांचे चिरंजीव पराग भोसले पाहत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अधिकृत पदावर असलेल्या व्यक्तीऐवजी इतरांकडून कामकाज चालवले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
यासोबतच नागरिकांचे महत्त्वाचे महसुली कामे वेळेत होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. मोबाईल फोन सतत बंद असणे, कार्यालयात अनुपस्थिती आणि नागरिकांना वारंवार ‘आज करू, उद्या करू’ अशी उत्तरे देऊन कामे लांबवली जात असल्याचेही सांगितले जात आहे.
या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सपकाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, श्रेया शशिकांत मोरे यांच्या वारस नोंदीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही संबंधित नोंद करण्यात आलेली नाही. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून त्यांचे काम मुद्दाम टाळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असून अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा विश्वास कमी होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून लवकरात लवकर परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment