साताऱ्यात युद्धविरोधी ‘शांती संदेश सत्याग्रह’; लोकशाहीच्या बाजूने नागरिकांचा जोरदार आवाज
साताऱ्यात युद्धविरोधी ‘शांती संदेश सत्याग्रह’; लोकशाहीच्या बाजूने नागरिकांचा जोरदार आवाज
सातारा प्रतिनिधी :
शहर व परिसरातील शांतिप्रिय नागरिक संघटना आणि विविध प्रतिनिधींच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात युद्धविरोधी ‘शांती संदेश सत्याग्रह’ उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गेटच्या डाव्या बाजूस आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत युद्ध आणि हिंसाचाराविरोधात ठाम भूमिका मांडली.
सत्याग्रहादरम्यान “नको युद्ध हवे बुद्ध”, “नको हुकूमशाही हवी लोकशाही”, “नो किंग नो वॉर” तसेच “ट्रम्पचे करायचे काय? खाली डोके वर पाय” अशा आशयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विक्रांत पवार, प्रशांत झालटे आदींनी दिलेल्या घोषणांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी न झालेल्या जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनीही या आंदोलनाकडे उत्सुकतेने पाहत आपली दखल घेतली.
युद्धामुळे वाढती महागाई, गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि भविष्यात निर्माण होऊ शकणारी विनाशकारी परिस्थिती याबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “युद्ध थांबवण्यासाठी संबंधितांनी तातडीने प्रयत्न करावेत, अन्यथा देशभर सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यात येईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या सत्याग्रहात अस्लम तरडसरकर, विजय निकम, चंद्रकांत खंडाईत, रियाज शेख, रमेश इंजे, रेश्मा शेख, गणेश कारंडे, योगेश कांबळे, दिलाल शेख, संजय प्र. भोसले, प्रमोद पाटील, संदीप ढवळे, रामदास वाघमारे, अनिल वीर, माजी प्राचार्य रमेश जाधव, विजय गायकवाड, डॉ. आबासाहेब उमाप, सतीश गाडे, दिलीप सावंत आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांना बी.एल. माने यांनी चहाची व्यवस्था केली, तर प्रशांत झालटे यांनी थंडगार पाण्याच्या बाटल्यांची सोय करून सहभागींना दिलासा दिला. शांततेचा संदेश देणारा हा सत्याग्रह शहरात चर्चेचा विषय ठरला.
Comments
Post a Comment