“विकसित भारताच्या पायाभरणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका निर्णायक”; राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ठाम विश्वास
“विकसित भारताच्या पायाभरणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका निर्णायक”; राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ठाम विश्वास
सातारा प्रतिनिधी , दि. २२ :
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, सुसंस्कृत आणि सुदृढ पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या निष्ठेने पार पाडत आहेत. गरोदर माता व बालकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळताना त्या समाजाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सर्व रास्त मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.
भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या तिसऱ्या वार्षिक प्रदेश अधिवेशनाचे आयोजन साताऱ्यातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवार पेठ येथे करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर होत्या.
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, नगरसेविका सिद्धी पवार, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे, महासंघाच्या सचिव संगीता श्रीवास्तव, सरचिटणीस किरण मिलगीर, श्रीपाद कुटासक आदी मान्यवर उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडत अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवला.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक पार पडली असून, त्या बैठकीत त्यांच्या हिताचे अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. सेविकांच्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी आणि त्यांना आधुनिक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल संच देण्यात येत असून, त्याद्वारे गरोदर मातांची नोंदणी, लसीकरणाची माहिती, पोषण आहाराचे व्यवस्थापन आणि इतर प्रशासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने सुलभ होणार आहेत.
अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सेविकांचे मानधन, सेवा अटी, निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा आणि कामाचा वाढता ताण या मुद्द्यांवर उपस्थितांनी आपली मते मांडली. या चर्चेतून पुढे येणाऱ्या मागण्यांवर शासन सकारात्मकतेने आणि तातडीने विचार करेल, असे आश्वासनही बोर्डीकर यांनी दिले.
अंगणवाडी सेविका केवळ कर्मचारी नसून त्या समाजाच्या भविष्यास आकार देणाऱ्या ‘समाजशिल्पी’ आहेत, असे सांगताना त्यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. बालकांचे संगोपन, पोषण, शिक्षण आणि मातृआरोग्य यांसारख्या संवेदनशील क्षेत्रात त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कष्टाची योग्य दखल घेणे आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष असून, त्यांच्या अनेक मागण्या यापूर्वीच पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार बोर्डीकर यांनी केला.
अधिवेशनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला असून, राज्यभरातील अंगणवाडी सेविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment