पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या रखडलेल्या कामावर जनतेचा संताप; आज पाचगणीत सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांची निर्णायक बैठक
पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या रखडलेल्या कामावर जनतेचा संताप; आज पाचगणीत सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांची निर्णायक बैठक
पाचगणी प्रतिनिधी :
पाचगणी–महाबळेश्वर मुख्य रस्त्याच्या रखडलेल्या आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि व्यापारी यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून हा जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी, उडणारा प्रचंड धुरळा आणि खड्डेमय रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
सध्या सुरू असलेल्या कामाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. दिवसभर उडणाऱ्या धुरळ्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुरळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या महाबळेश्वरमधील व्यापाऱ्यांनी रविवारी बाजारपेठ आणि रस्त्यालगतची हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला असून त्यानंतर आता पाचगणीतही आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर आज पाचगणी येथे सर्वपक्षीय आणि व्यापारी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाचगणी क्लब येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. पाचगणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित यांनी शहरातील सर्व व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
मेहुल पुरोहित यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे केवळ व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत नाही, तर पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच उडणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात शहरातील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाबळेश्वरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिल्यानंतर आता पाचगणीतील व्यापारी आणि सर्वपक्षीय नेते कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या या बैठकीतून प्रशासनाला कडक इशारा दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम तातडीने, नियोजनबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
त्यामुळे आज होणारी ही बैठक पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणारी ठरणार असून शहरातील लहान-मोठे व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment