देवळी–झांजवड–नालासोपारा–ठाणे बससेवेवर प्रवाशांचा संताप; पोलादपूरपर्यंतच तिकीट, पुढे रिझर्वेशनची अट
देवळी–झांजवड–नालासोपारा–ठाणे बससेवेवर प्रवाशांचा संताप; पोलादपूरपर्यंतच तिकीट, पुढे रिझर्वेशनची अट
कुंभरोशी प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली देवळी–झांजवड–नालासोपारा–ठाणे ही एसटी बससेवा सध्या स्थानिक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या बससेवेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावा, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या या बसमध्ये स्थानिक प्रवाशांना केवळ पोलादपूरपर्यंतच तिकीट दिले जात असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी फक्त रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे देवळी, झांजवड आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना ठाणे किंवा नालासोपारा या ठिकाणी जाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन कामे, वैद्यकीय उपचार, शिक्षण तसेच नोकरी-व्यवसायासाठी मुंबई उपनगरांमध्ये जावे लागते. मात्र या बसमध्ये पोलादपूरनंतर स्थानिक प्रवाशांना प्रवास करू दिला जात नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे वेळ आणि पैशांची अतिरिक्त नासाडी होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बससेवा स्थानिकांच्या सोयीसाठीच सुरू करण्यात आली असताना प्रत्यक्षात मात्र त्यांनाच प्रवास करता येत नसल्यामुळे प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकांनी ठाणे डेपो प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक प्रवाशांना पोलादपूरनंतरही तिकीट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे. ठाणे डेपोने याबाबत गांभीर्याने विचार करून ग्रामीण भागातील प्रवाशांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment