गॅस दरवाढीविरोधात साताऱ्यात महाविकास आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध
गॅस दरवाढीविरोधात साताऱ्यात महाविकास आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध
सातारा प्रतिनिधी :
गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने साताऱ्यात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून तसेच हातात ताट घेऊन वाजवत आंदोलनकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या वेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
साताऱ्यात आयोजित या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाढत्या गॅस दरांमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून स्वयंपाकघरावर मोठा आर्थिक ताण येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस कनेक्शन दिले असले तरी दरवाढीमुळे अनेक महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान आखाती देशांमधील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात गॅस व इंधन टंचाई निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आला. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीची कल्पना असूनही केंद्र सरकारने पुरेशी पूर्वतयारी का केली नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत असून भविष्यात याचा मोठा जनआक्रोश होऊ शकतो, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली. महागाई, गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील काळेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाढत्या गॅस दरांमुळे सामान्य कुटुंबांचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारने तातडीने गॅस दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा अशा आंदोलनांची तीव्रता वाढवली जाईल.
Comments
Post a Comment