“जनतेसाठी पुढाकार” : महाबळेश्वरात ‘जनता मदत केंद्र’ची सुरुवात; शासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन
“जनतेसाठी पुढाकार” : महाबळेश्वरात ‘जनता मदत केंद्र’ची सुरुवात; शासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन
महाबळेश्वर, दि. १७ (प्रतिनिधी) :
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कामांबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रिपब्लिकन Party of India (आठवले) महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने ‘जनता मदत केंद्र’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या केंद्राचे उद्घाटन मंगळवार, १७ मार्चपासून करण्यात आले आहे. महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे केंद्र कार्यरत राहणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ दुर्गम भागातून मंगळवारच्या साप्ताहिक बाजाराच्या निमित्ताने शहरात येतात. या वेळी ते आपल्या शासकीय कामांसाठीही तहसील कार्यालयात येतात. मात्र आवश्यक माहितीचा अभाव, कागदपत्रांची अपुरी माहिती किंवा प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून रिपब्लिकन Party of India (आठवले)च्या वतीने ‘जनता मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
केंद्रामार्फत रेशन कार्ड संदर्भातील विविध कामे जसे की नवीन रेशन कार्ड काढणे, नावात बदल करणे, कुटुंब विभक्त करणे आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन यांसारख्या विविध सरकारी योजनांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे. समाज कल्याण विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन अर्ज प्रक्रियेबाबतही नागरिकांना सहाय्य केले जाणार आहे.
याशिवाय, नवीन लघुउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना शासनाच्या विविध योजना, कर्ज सुविधा आणि इतर आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ शासकीय कामे सोडवण्यापुरतेच नव्हे, तर रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका अध्यक्ष जॉन जोसेफ, शहर अध्यक्ष विनय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मिथुन तळवळकर आणि पापू भोसले हेही सक्रियपणे पुढाकार घेत असून नागरिकांना थेट मार्गदर्शन करत आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा आणि मार्गदर्शन मिळणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि श्रमांची बचत होणार आहे. तसेच शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment