“बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ; तळदेव येथे ‘बाल आनंद मेळावा’ रंगणार”
“बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ; तळदेव येथे ‘बाल आनंद मेळावा’ रंगणार”
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती महाबळेश्वर (शिक्षण विभाग) यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील केंद्र मांघर, येरणे बु॥, वेळापूर ता. महाबळेश्वर जि. सातारा येथील शाळांचा ‘बाल आनंद मेळावा’ बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत सांस्कृतिक भवन, तळदेव येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शालेय शिक्षण अधिक आनंददायी बनविणे हा मुख्य उद्देश आहे.
या मेळाव्यात विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रात्यक्षिके, विज्ञान व कला प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा तसेच हस्तकला व नवोपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक आणि स्थानिक परंपरा जपणारे लोककला कार्यक्रम हे या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढण्यास चालना मिळणार आहे.
बालचमूंच्या सक्रिय सहभागातून सर्जनशीलता, सहकार्य, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याची ही सुवर्णसंधी असून, शिक्षणासोबतच आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षणाची जाणीव त्यांना होणार आहे. त्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकवर्गामध्येही या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. धोंडीबा जंगम, मा. श्री. अजित संकपाळ, मा. सौ. शकुंतला रमेश चोरमले, मा. श्री. संजुबाबा गायकवाड, मा. श्री. संजय केळगणे, मा. श्री. संजय मोरे, मा. श्री. राजेंद्रशेठ राजपुरे, मा. श्री. विजय विभुते, मा. श्री. संजय शेलार, मा. श्री. रामचंद्र जंगम, मा. श्री. रमेश गंबरे तसेच मा. सौ. वंदना भिलारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळणार असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख मा. श्री. चंद्रकांत जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांची तयारी, विविध उपक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली असून, संपूर्ण परिसरात सध्या या मेळाव्याची लगबग पाहायला मिळत आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जाणीवा विकसित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पालक आणि ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि शिक्षणाला नवचैतन्य देणारा हा ‘बाल आनंद मेळावा’ निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.
Comments
Post a Comment