तळदेव–तापोळा परिसरात बीएसएनएल सेवा कोलमडली; “रिचार्ज करूनही उपयोग नाही” म्हणत नागरिकांचा संताप उफाळला
तळदेव–तापोळा परिसरात बीएसएनएल सेवा कोलमडली; “रिचार्ज करूनही उपयोग नाही” म्हणत नागरिकांचा संताप उफाळला
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव, तापोळा आणि परिसरातील ग्रामीण भागात Bharat Sanchar Nigam Limited (बीएसएनएल) ची मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडली असून नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्क पूर्णपणे ठप्प असून जिथे सिग्नल मिळतो, तिथेही तो अत्यंत कमजोर असल्याने फोन कॉल, इंटरनेट सेवा आणि डिजिटल व्यवहार जवळपास अशक्य झाले आहेत.
या भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला असून, परीक्षा तयारी, नोट्स डाउनलोड करणे, ऑनलाइन क्लासेस अटेंड करणे यांसारख्या गोष्टींमध्ये गंभीर अडचणी येत आहेत. तसेच शासकीय योजना, बँकिंग व्यवहार आणि विविध डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
तापोळा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र नेटवर्क नसल्यामुळे हॉटेल बुकिंग, ऑनलाइन पेमेंट, लोकेशन शोधणे (नेव्हिगेशन) यांसारख्या सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. परिणामी पर्यटकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक व्यावसायिकांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही रिचार्ज फक्त कंपनीला मोठं करण्यासाठी करतो का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत असून, सेवा मिळत नसताना पैसे मोजावे लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सांगितले की, फोन करताना कॉल मध्येच कट होणे, आवाज व्यवस्थित न ऐकू येणे, तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडणे या समस्या रोजच्या झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधतानाही प्रचंड अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या संदर्भात स्थानिकांनी वारंवार महाबळेश्वर येथील बीएसएनएल कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि बीएसएनएलच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सेवा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असून, बीएसएनएलने तात्काळ लक्ष देऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अन्यथा जनआंदोलन अटळ असल्याचे संकेत नागरिकांकडून देण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment