वाई–महाबळेश्वर तालुक्यात दोन वर्षांत ४०० पूल पूर्ण; विकासाच्या कामांची ठोस साक्ष – नामदार मकरंद आबा पाटील
वाई–महाबळेश्वर तालुक्यात दोन वर्षांत ४०० पूल पूर्ण; विकासाच्या कामांची ठोस साक्ष – नामदार मकरंद आबा पाटील
कुंभरोशी प्रतिनिधी –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंभरोशी परिसरात आयोजित प्रचार सभेत नामदार मकरंद आबा पाटील यांनी वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा मांडत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. मागील दोन वर्षांच्या कालावधीत वाई व महाबळेश्वर तालुक्यात एकूण ४०० पूल पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम झाले आहे. याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना होत असून शेतीमालाची वाहतूक वेगवान झाली आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की, अडचणीच्या काळात जनतेच्या सोबत कोण उभे होते आणि आज केवळ विकासाच्या घोषणा देणारे उमेदवार त्या वेळी कुठे होते, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभाग घेतला असून परखड नेतृत्व देणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार हे कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
अजितदादा आपल्यातून निघून गेले याचे दुःख आहे, मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहनही यावेळी करण्यात आले. अजितदादांच्या विचारांना पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे सांगत जिल्हा परिषद उमेदवार संजय गायकवाड आणि पंचायत समिती उमेदवार सचिन उतेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची जोरदार मागणी नामदार मकरंद आबा पाटील यांनी केली.
या प्रचार सभेला राजूशेठ राजपुरे, संजय गायकवाड, नगराध्यक्ष सुनील शिंदे, बाबुराव सपकाळ, माजी सभापती संजय जंगम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील तब्बल २२ गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहिले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जोश आणि उपस्थितांची गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा कौल या सभेतून स्पष्टपणे दिसून आला.
Comments
Post a Comment