कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल
कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल
जितेंद्र करंडे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात आता विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, या भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या दुर्गम परिसरात शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले रस्ते बळकट आणि सुलभ करण्यात येत आहेत.
पूर्वी महाबळेश्वर येथून कांदाटी खोऱ्यात पोहोचण्यासाठी तब्बल आठ ते दहा तासांचा कठीण प्रवास करावा लागत होता. खराब रस्ते, डोंगराळ भूप्रदेश आणि मर्यादित वाहतूक सुविधा यामुळे हा भाग मुख्य प्रवाहापासून तुटलेला होता. मात्र, आता नव्या रस्त्यांमुळे हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य झाला असून, स्थानिक नागरिकांसह व्यापारी, पर्यटक आणि प्रशासनासाठीही हा मोठा दिलासा ठरला आहे.
कोट्रोशी ते उचाट या मार्गाचे काम सुरू झाल्याने दीर्घकाळ संपर्कापासून वंचित असलेला परिसर आता थेट मुख्य रस्त्यांशी जोडला गेला आहे. यामुळे शैक्षणिक, आरोग्य, व्यापार तसेच कृषी उत्पादनांच्या वाहतुकीस मोठी चालना मिळणार आहे. त्याचबरोबर रघुवीर घाटाच्या माध्यमातून खेड तालुक्याशी थेट संपर्क निर्माण झाल्याने या संपूर्ण पट्ट्यातील दळणवळण अधिक गतिमान झाले आहे.
कांदाटी खोरे निसर्गसौंदर्याने नटलेले असून, कोयना धरणाचा बॅकवॉटर असलेला शिवसागर जलाशय विस्तीर्ण पसरलेला आहे. हिरवीगार डोंगररांग, घनदाट जंगल, जलाशयाचे शांत सौंदर्य आणि स्वच्छ हवामान यामुळे हा परिसर भविष्यात पर्यटकांसाठी एक आकर्षक केंद्रबिंदू ठरणार आहे. या नैसर्गिक संपदेचा लाभ स्थानिक जनतेला मिळावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधता यावा, या उद्देशाने या भागाच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलण्यात आला आहे.
येत्या चार ते पाच वर्षांत कांदाटी खोरे पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला जात असून, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, दूरसंचार आणि मूलभूत सुविधा विकसित झाल्यास हा भाग ग्रामीण पर्यटनाचे आदर्श केंद्र ठरू शकतो. या विकास प्रक्रियेमुळे येथील जीवनमान उंचावणार असून, कांदाटी खोऱ्यातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची मोठी संधी मिळणार आहे.
एकूणच, दूरवरच्या दुर्गमतेत अडकलेल्या कांदाटी खोऱ्याला विकासाच्या प्रकाशात आणण्याचे काम सुरू झाले असून, हे पर्व या संपूर्ण परिसरासाठी परिवर्तनकारी ठरणार आहे.
Comments
Post a Comment