दुर्गम भागातील शाळांसाठी स्नेहांकुरचा मायेचा हात; महाबळेश्वर तालुक्यात ८०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
दुर्गम भागातील शाळांसाठी स्नेहांकुरचा मायेचा हात; महाबळेश्वर तालुक्यात ८०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
महाबळेश्वर प्रतिनिधी:
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी पुणे येथील स्नेहांकुर सामाजिक संस्थेमार्फत दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य स्वरूपात शैक्षणिक साहित्य वितरण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सहा केंद्रांतील जवळपास ८०० शालेय व अंगणवाडी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माचुतर, शिरवली, वेळापूर, वाळणे, खरोशी आणि लामज या सहा केंद्रांमधील शाळांमध्ये स्नेहांकुर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले. दुर्गम भागातील शाळांमध्ये आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने एरंडल, तळदेव, आकल्पे आणि मेटतळे येथील शाळांना प्रत्येकी ४२ इंच आकाराचे स्मार्ट टीव्ही आणि सर्व इयत्तांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक सॉफ्टवेअर देण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी व मोबाईलच्या आधुनिक युगात पुस्तकांशी नाते जपले जावे, यासाठी धारदेव, मेटतळे, दुधगाव, भेकवली मराठी, आकल्पे, वाघावळे आणि तापोळा या शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीची वाचन पेटी वितरित करण्यात आली. तसेच मेटतळे येथील अंगणवाडीसाठी धान्यकोठी आणि कुकरचे वितरण करण्यात आले.
दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी गरीब कुटुंबातून येत असल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्नेहांकुरसारख्या सामाजिक संस्थांनी पुढे येणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी श्री रमेश गंबरे यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांपासून स्नेहांकुर संस्था सातत्याने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमास स्नेहांकुर संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दातार, वृषाली दातार, अभिजित दातार, विवेक साने, पूर्वा गदो, प्रीती जाधव, उमेश शिंदे, राहुल सपकाळ, अनिकेत धामुणसे, सागर नातू यांच्यासह केंद्रप्रमुख श्री विनायक पवार, श्री दगडू ढेबे, संजय पारठे, श्री चंद्रकांत जंगम, वरिष्ठ सहायक श्री सुहास कुलकर्णी, विषय शिक्षक श्री सचिन चव्हाण, श्री कुलदीप अहिवाळे, श्री अभिजीत खामकर, सौ जोशी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल सपकाळ, सरस्वती ढेबे, भगवान गवळी, सुवर्णा नवगण, उमेश शिंदे, राहुल किरडे यांच्यासह अनेक शिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment