संवर्धन की निर्लज्ज ढोंग? महाबळेश्वर–जावलीत वन्यजीव मृत्यूंची मालिकाच, वन्यजीव विभागाच्या निष्क्रियतेवर संतप्त सवाल
संवर्धन की निर्लज्ज ढोंग? महाबळेश्वर–जावलीत वन्यजीव मृत्यूंची मालिकाच, वन्यजीव विभागाच्या निष्क्रियतेवर संतप्त सवाल
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर–जावली परिसरात सध्या जे काही सुरू आहे, त्याला खरंच संवर्धन म्हणायचं की केवळ निर्लज्ज ढोंग—हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. एकीकडे वाघ व्याघ्र प्रकल्पात सोडून छाती फुगवत प्रसिद्धी घेतली जाते, तर दुसरीकडे गव्यासह इतर वन्यजीव मृत्यूच्या घोक्यात असताना केवळ कागदोपत्री रंगरंगोटी केली जाते. जमिनीवर परिस्थिती विदारक असताना फाईली मात्र टेबलावर गुळगुळीत फिरत असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे.
गेल्या काही महिन्यांत गवे, हरणे, रानडुक्कर, माकडे यांचे मृत्यू, जखमी अवस्थेत तडफडणे, उपासमारीने हाल होणे आणि पाण्याअभावी प्राण सोडणे या घटना सातत्याने वाढत आहेत. अनेक ठिकाणी जखमी गवे तासन्तास मदतीअभावी तडफडताना दिसतात, मात्र वन्यजीव विभागाकडून वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचत नाही. दरवेळी विभागाची ठरलेली स्क्रिप्ट सुरू होते—“नैसर्गिक मृत्यू”, “चौकशी सुरू आहे”, “अहवाल पाठवला आहे”. मात्र हे अहवाल नेमके कुठे जातात आणि मृत्यू का थांबत नाहीत, याचे उत्तर कुणाकडेच नाही.
वाघ संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी, आधुनिक वाहने, ट्रॅकिंग यंत्रणा, समित्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी यासाठी सर्व काही उपलब्ध आहे. मात्र गव्यासाठी पाणवठे कोरडे, कुरण विकास शून्य, अधिवास नष्ट, वैद्यकीय मदत उशिरा आणि नियोजनाचा अभाव अशी भयावह स्थिती आहे. त्यामुळे संवर्धन म्हणजे फक्त वाघापुरतेच मर्यादित आहे का, गवे आणि इतर वन्यजीव दुय्यम आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि वन्यजीवप्रेमी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. पाणी आणि अन्नाअभावी वन्यजीव वस्तीत शिरत असून त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्ष वाढत आहे. रस्ते अपघात, शेतीचे नुकसान आणि जीवितहानीचे धोके निर्माण होत आहेत. तरीही वन्यजीव विभाग मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. ही केवळ उदासीनता नसून सरळसरळ निष्क्रियता आहे, आणि या निष्क्रियतेचे परिणाम जंगल, माणूस आणि संपूर्ण पर्यावरणावर गंभीर स्वरूपात पडत आहेत.
आता केवळ फोटोसेशन, बैठका आणि कागदी संवर्धन पुरे झाले असून प्रत्यक्ष कृतीची मागणी जोर धरू लागली आहे. तातडीने पाणवठे उभारणे, कुरण विकास करणे, वैद्यकीय यंत्रणा सक्षम आणि तत्पर करणे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. अन्यथा हे संपूर्ण संवर्धन केवळ ढोंग ठरेल, असा इशारा स्थानिक नागरिक देत आहेत.
आज गवे मरत आहेत, उद्या कोण—हा प्रश्न आता केवळ वन्यजीव विभागालाच नाही, तर संपूर्ण व्यवस्थेलाच विचारला जात आहे. महाबळेश्वर–जावलीच्या जंगलांचा श्वास कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर वाचवण्याची वेळ आली आहे, आणि ती आत्ताच.
Comments
Post a Comment