प्रतापगडाचा बुलंद आवाज शांत; शिवप्रताप दिनाची धग जपणाऱ्या विजयाताई भोसले (ननी) यांचे निधन
सातारा प्रतिनिधी :
प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक, प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘ननी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शिवप्रेमी कार्यकर्त्या विजयाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्त, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी चळवळीत शोककळा पसरली असून प्रतापगडावरील लढाऊ, निर्भीड आणि बुलंद आवाज कायमचा शांत झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, स्वराज्याची अस्मिता आणि शिवप्रताप दिनाचा जागर हेच विजयाताईंच्या आयुष्याचे केंद्र होते. प्रतापगडावर साजऱ्या होणाऱ्या अफझलखान वध स्मृतीदिनाला केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता तो राज्यस्तरीय आणि सरकारी पातळीवर गौरवाने साजरा व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ठाम भूमिकेमुळे शिवप्रताप दिनाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि हा दिवस शिवप्रेमींसाठी अभिमानाचा बनला.
प्रतापगडावरील ऐतिहासिक परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी विजयाताईंनी अनेक आघाड्यांवर लढे दिले. अफझलखानाच्या थडग्याभोवती झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात त्यांनी न्यायालयीन तसेच सामाजिक पातळीवर कणखर संघर्ष केला. कोणत्याही दबावाला न झुकता त्यांनी घेतलेली भूमिका हिंदुत्ववादी संघटनांसाठी दिशादर्शक ठरली. त्यामुळेच त्या केवळ कार्यकर्त्या नव्हत्या, तर चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जात होत्या.
गड–कोट संवर्धन हा विजयाताईंचा जिव्हाळ्याचा विषय होता. प्रतापगडासह राज्यातील अनेक किल्ल्यांच्या जतनासाठी त्यांनी तरुणांना एकत्र आणले, दुर्गप्रेमी चळवळीला बळ दिले आणि इतिहासाशी नाळ जोडण्याचे काम केले. शिस्तप्रिय स्वभाव, स्पष्ट शब्दांत मांडलेली भूमिका आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे सातारा जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा मोठा लोकसंग्रह निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या शब्दाला विशेष वजन होते आणि अनेक तरुणांनी त्यांना आदर्श मानले.
विजयाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियावरून श्रद्धांजलीचा ओघ सुरू असून विविध दुर्गप्रेमी संस्था, शिवभक्त संघटना तसेच राजकीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “प्रतापगडाचा बुलंद आवाज हरपला”, “एक धगधगते अग्निकुंड शांत झाले”, “प्रतापगडाची वाघीण हरपली” अशा भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह त्यांनी घडवलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी असून, त्यांनी जपलेला शिवविचार आणि इतिहासप्रेमाचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
विजयाताई भोसले (ननी) यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर एका चळवळीचे प्रतीक होते. त्यांची उणीव प्रतापगडावर, शिवप्रताप दिनात आणि प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात कायम जाणवत राहणार आहे.
Comments
Post a Comment