दुर्गम तळदेव गटात शिवसेनेचा नवा चेहरा; अजित संकपाळांना जनतेचा वाढता प्रतिसाद
दुर्गम तळदेव गटात शिवसेनेचा नवा चेहरा; अजित संकपाळांना जनतेचा वाढता प्रतिसाद
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळदेव जिल्हा परिषद गटातून यंदा शिवसेनेने नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला संधी दिली असून अजित संकपाळ हे शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे अजित संकपाळ यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तळदेव, तापोळा, सोळशी, कांदाटी, कोयना आणि कुंभरोशी या दुर्गम परिसरात व्यापक लोकसंपर्क सुरू केला आहे. गावोगावी भेटी, वाड्यावस्त्यांवर संवाद, नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यावर त्यांनी भर दिला असून त्यामुळे अल्पावधीतच त्यांची ओळख वाढताना दिसत आहे.
या दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा, रस्ते, पाणी आणि आपत्कालीन मदतीची मोठी गरज असल्याचे लक्षात घेऊन अजित संकपाळ यांनी निवडणुकीआधीच सामाजिक कामांवर भर दिला आहे. वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक गरजूंना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेषतः कोयना आणि तळदेव परिसरात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अनेक नागरिकांना वेळेत उपचार मिळाले असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दुर्गम वाड्यांमधील आदिवासी बांधव, शेतकरी, मजूर आणि युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्यावर तातडीचे उपाय सुचवणे आणि शक्य तिथे प्रत्यक्ष मदत करणे, ही अजित संकपाळ यांची कार्यपद्धती ठरत आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्रांची कमतरता, शिक्षण सुविधा आणि रोजगाराचे प्रश्न हे या भागातील जिव्हाळ्याचे मुद्दे असून, निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी नागरिकांशी संवादात स्पष्ट केले आहे.
राजकारणातील नवीन चेहरा, कोणताही वादग्रस्त डाग नसलेली प्रतिमा, सामाजिक बांधिलकी आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भूमिका यामुळे अजित संकपाळ यांच्याविषयी नागरिकांच्या मनात आदर निर्माण होत आहे. एकीकडे अनुभवी राजकीय नेत्यांची लढत असताना, दुसरीकडे शिवसेनेने दिलेली ही नव्या चेहऱ्याची संधी तळदेव गटात नवे राजकीय समीकरण निर्माण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुर्गम भागातील प्रश्न समजून घेणारा आणि कामाच्या माध्यमातून विश्वास संपादन करणारा उमेदवार म्हणून अजित संकपाळ यांच्याकडे पाहिले जात असून येत्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment